भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना घेऊन एक्सियम-4 अवकाशात झेपावले आहे.
मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान अर्थात 'आयएसएस'मध्ये (International Space Station) जात आहेत. मात्र ही मोहीम चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली होती. पण आज ( 25 जून ) हे अवकाशयान अंतराळात झेपावले आहे.
रॉकेटमध्ये आढळलेल्या तांत्रिक त्रुटी आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये झालेल्या गळतीसारख्या समस्यांमुळे हे मिशन थांबवण्यात आले होते. अंतराळवीर तिथे दोन आठवडे राहणार आहेत.
यामध्ये अमेरिका, भारत, हंगेरी आणि पोलंडचे अंतराळवीर आहेत. ही मोहीम अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सुरुवातीला याच्या प्रक्षेपणाची तारीख 29 मे ठरवण्यात आली होती. त्यानंतर ती 8 जूनपर्यंत पुढे ढकलली गेली. नंतर 9 आणि 10 जूनपर्यंत स्थगित केली गेली. त्यानंतर 11, 12, 19 जूनपर्यंत ती पुढे ढकलली गेली.
याआधी राकेश शर्मा असे पहिले भारतीय होते, जे 1984 साली रशियन मोहिमेअंतर्गत अवकाशात झेपावले होते. विशेष म्हणजे, तेव्हा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा जन्मदेखील झालेला नव्हता.
हे नवं मिशन याआधी आठ जून रोजी अंतराळ स्थानकातून रवाना होणार होतं. मात्र, खराब हवामानामुळे हे अभियान 11 जून रोजी लॉन्च करण्याची शक्यता होती. मात्र, आता पुन्हा काही तांत्रिक अडचणींमुळे हे अभियान पुढे ढकलण्यात आलं आहे.
हे एक कमर्शियल मिशन आहे. एक्सियम स्पेस नावाची अमेरिकन कंपनी, नासा आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे मिशन पार पाडलं जात आहे.
हे या कंपनीचं चौथं मिशन असून पहिल्यांदाच एखादा भारतीय अंतराळवीर या मिशनमध्ये सहभागी असणार आहे. शुभांशु शुक्ला यांच्यासमवेत आणखी तीन अंतराळवीर या मिशनसाठी पाठवले जात आहेत.
एक्सियम-4 मिशन काय आहे?एक्सियम-4 मिशन एक कमर्शियल स्पेस फ्लाईट आहे. ह्यूस्टन की कंपनी हे एक्सियम स्पेस अभियान पार पाडते.
या एक्सियम-4 मिशनमधील एक जागा भारताने खरेदी केली आहे, ज्यासाठी 550 कोटी रुपये द्यावे लागले आहेत.
अंतराळवीर म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लादेखील अंतराळात जाणार आहेत आणि 14 दिवसांसाठी अंतराळात राहणार आहेत.
एक्सियम-4 (Axiom - 4) ही मोहीम राबवण्यात येतेय Axiom Space या खासगी स्पेसफ्लाईट कंपनीद्वारे. त्यांनी या मोहिमेसाठी नासा, इस्रो, युरोपियन स्पेस एजन्सी या अंतराळसंस्थांसोबत भागीदारी केली आहे.
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे एक्सियम-4 मिशनचे पायलट असतील. नासाच्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून ही मोहीम झेपावेल. यासाठी स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टचा वापर केला जाईल आणि ही मोहीम 14 दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल.
नासाच्या अंतराळवीर पेगी व्हिटसन या मिशनच्या कमांडर असतील. युरोपीयन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर स्टावोझ युझनान्स्की विझन्युस्की (Sławosz Uznański-Wiśniewski) हे पोलंडचे आहेत. तर तिसरे अंतराळवीर टिबोर कापू हे हंगेरीचे आहेत.
भारतासाठी का आहे हे मिशन महत्त्वाचं?1984 साली भारताचे अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा हे सोवियत संघ मिशनसोबत अंतराळात गेले होते. एक्सियम-4 च्या माध्यमातून आता दुसरा भारतीय व्यक्ती अंतराळात झेपावणार आहे.
भारतीय अंतराळवीर म्हणून आणखी काही अंतराळवीरांचं नाव नक्कीच घेतलं जातं. त्यामध्ये, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांची नावे आघाडीवर असतात. मात्र, या दोघीही भारतीय वंशाच्या आहेत, त्या भारतीय नाहीत.
विज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक पल्लव बागला यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "एक्सियम-4 भारतासाठी याकरिता महत्त्वाचं आहे कारण, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) त्यांच्या मानवी मोहिमेसाठी मदत होईल.
गगनयान मिशन हे भारताची स्वत:ची पहिली अशी मानवी मोहिम आहे. यामध्ये एका भारतीय व्यक्तीला भारतीय रॉकेटच्या मदतीने श्रीहरीकोटा स्टेशनमधून अंतराळात पाठवलं जाईल. 2027 मध्ये हे मिशन राबवण्यात येईल, अशी आशा आहे.
पल्लव बागला पुढे सांगतात की, "हे एकप्रकारे आपल्या गगनयान मोहिमेच्या दिशेने छोटी-छोटी पावलं टाकण्यासारखंच आहे. आपण या अभियानाच्या माध्यमातून काही शिकू शकू, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक करार केला होता. आता तोच करार प्रत्यक्षात उतरत आहे. तब्बल 41 वर्षांनंतर आपला कुणी अंतराळवीर अंतराळात झेपावतो आहे."
बागला यांच्यामते "पुढे जे नियोजन आहे, त्यानुसार, 2035 पर्यंत भारताला एक स्वत:चं अंतराळ स्थानक मिळेल. पंतप्रधान मोदी यांनी इस्रोला सांगितलंय की, एका भारतीय व्यक्तीला आपल्या रॉकेटमधून, आपल्या ताकदीच्या जोरावर चंद्रावर पाठवण्यात यावं. त्यासाठी 15 वर्षांचा रोडमॅप इस्रोच्या डोळ्यांपुढे स्पष्ट आहे. याच रोडमॅपनुसार, आपल्या एका अंतराळवीराला एक्सियम-4 मिशन अंतर्गत अंतराळात पाठवणं, हे पहिलं पाऊल आहे"
पुढे त्यांनी म्हटलं की, "आपल्या अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्ण प्रशिक्षण मिळत आहे. इस्रोला अद्याप मानवी अंतराळ उड्डाणाचा अनुभव नाही. ते एक वेगळे क्षेत्र आहे. आतापर्यंत आपण उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत; पण मानवी मोहीम हे एक कठीण काम आहे."
शुभांशु शुक्ला कोण आहेत आणि ते काय करणार आहेत?शुभांशु शुक्ला भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत. अमेरिकेची नासा (NASA)आणि भारताची इस्रो (ISRO) या जगातील दोन आघाडीच्या अंतराळ संस्थांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झाली आहे.
1985 साली जन्मलेले शुक्ला हे उत्तर प्रदेशातल्या लखनौचे रहिवासी आहेत. 2006 मध्ये ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले आणि त्यांना 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुखोई-30 MKI, मिग-21S, मिग-29 S, जॅग्वार, हॉक्स डॉर्नियर्स आणि N-32 सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुक्लांच्या गाठीशी आहे.
त्यांचा वैयक्तिक प्रवास नेमका कसा होता, यासंदर्भात सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांपैकी शुक्ला एक आहेत. या Ax-4 मोहिमेत त्यांच्यासोबत इतर 3 अंतराळवीर असतील.
मिशन पायलट म्हणून, शुभांशु शुक्ला यांची भूमिका मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यात महत्त्वाची आहे. यामध्ये रॉकेटचे प्रक्षेपण, त्याचं कक्षेत पोहोचणं, आयएसएसवर त्याचं डॉकिंग होणं, त्याचं परत येणं आणि सुरक्षित लँडिंग होणं, या सगळ्याचा यात समावेश आहे.
या मिशनदरम्यान पृथ्वीवर मिशन कंट्रोल टीमसोबत संवाद करण्याची जबाबदारीही त्यांचीच असेल.
एक्सियम-4 एक कमर्शियल स्पेसफ्लाईट असल्याने त्याद्वारे अनेक नवे प्रयोग देखील केले जाणार आहेत.
नासाच्या वेबसाइटवर जी माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार, या मिशनमध्ये सायन्स, आऊटरिच आणि कमर्शियल ऍक्टीव्हीटीजवर फोकस करण्यात येईल.
शुभांशु शुक्ला यांच्यासहित एक्सियम-4 ची ही टीम बियाणे उगवणे आणि अवकाशात वनस्पती कशा वाढवल्या जाऊ शकतात, याचाही अभ्यास करेल.
या काळात, जवळजवळ शून्य गुरुत्वाकर्षणावर अवकाशात वनस्पती कशा वाढतात, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, या वनस्पतींमध्ये कोणते गुणधर्म असतील, हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
पल्लव बागला म्हणतात की, "एक्सियम-4 मिशनमध्ये जवळपास 60 वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत, जे एक्सियमच्या मागील तीन मिशनमध्ये झालेले नव्हते. या मोहिमेत सुमारे 30 देशांचे प्रयोग होत आहेत. शुभांशु शुक्ला हे त्यापैकी अनेक प्रयोगांचा भाग असतील. भारताच्या स्वतःच्या शास्त्रज्ञांनी यापैकी सात प्रयोग सुचवले आहेत."
ते म्हणाले की, भारताने कधीही अंतराळात खगोल-जीवशास्त्राचे प्रयोग केलेले नाहीत. त्या क्षेत्रातील हे भारताचं पहिलं पाऊल असेल.
याआधी, भारतातील एमिटी युनिव्हर्सिटीने, एका स्टार्टअपने आणि एका इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नोलॉजीने पीएसएलव्हीच्या माध्यमातून बायोलॉजीचे काही खास प्रयोग केले होते. मात्र, ते प्रयोग अंतराळातच राहिले होते, ते परत आणले गेले नव्हते. भारत पहिल्यांदाच असे प्रयोग पाठवत आहे, जे पुन्हा परतून येतील.
पल्लव बागला सांगतात की, या सात प्रयोगांशिवाय आणखी पाच असे प्रयोग आहेत, जे इस्रो आणि नासा मिळून करणार आहेत. मात्र, या प्रयोगांबाबत अद्याप सविस्तरपणे सांगण्यात आलेलं नाहीये.
पुढे बागला यांनी सांगितलं की, "शुभांशु शुक्ला अंतराळातून काही आऊटरिच ऍक्टीव्हीटीदेखील करतील. याअंतर्गत ते लखनऊमधील ज्या शाळेत शिकले आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांशी बातचित करतील. त्यासोबतच ते अंतराळ संशोधक, स्टार्टअप्ससोबत बातचित करतील. असंही सांगण्यात आलं आहे की ते एका व्हीआयपी व्यक्तीशीही संवाद साधतील. मात्र, ही व्हीआयपी व्यक्ती कोण आहे, ते नाव अद्याप उघड झालेले नाही."
1984 साली जेव्हा राकेश शर्मा अंतराळात गेले होते, तेव्हा त्यांनी तिथून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संवाद साधला होता. इंदिरा गांधींनी त्यांना प्रश्न विचारला होता की, अंतराळातून भारत कसा दिसतो? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये राकेश शर्मा यांनी म्हटलं होतं की, "सारे जहाँ से अच्छा..."
गगनयान मिशनसाठी होतील दरवाजे उघडे?भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम 'गगनयान' ही आहे. ही मोहीम अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं जातं. जर या मोहिमेबाबत सर्व काही व्यवस्थित झालं तर ते 2027 मध्ये ती अवकाशात जाईल. या मोहिमेअंतर्गत भारताने चार अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आखली आहे.
या मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवलं जाईल, त्यानंतर त्यांना तीन दिवसांनी परत यावं लागेल.
भारताने यासाठी चार अंतराळवीरांची निवडदेखील केली आहे आणि यामध्ये शुभांशु शुक्ला यांचंदेखील नाव आहे.
पल्लव बागला सांगतात की, "अंतराळातील मानवी मोहिम ही कधीही तितकीशी सोपी नसते. आतापर्यंत फक्त तीनच देशांना हे जमलं आहे. रशिया, अमेरिका आणि चीन या तीनच देशांनी आपल्या ताकदीच्या जोरावर हे साध्य केलं आहे. एक्सियम-4 एक मोठं पाऊल आहे. भारताने आपल्या गगनयान मोहिमेसाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे."
पुढे त्यांनी म्हटलं की, "जेव्हा एखादा माणूस अंतराळात जातो, तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी फारच सतर्कता बाळगावी लागते. एखाद्या व्यक्ती अंतराळात पाठवणं फार सोपं आहे, पण तिला सुरक्षितपणे परत आणणं अधिक अवघड आहे आणि तेच अधिक महत्त्वाचंही असतं."
ते पुढे सांगतात की, "भारताच्या गगनयान मिशनसाठी एक्सियम-4 फारच महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल आहे. मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते तातडीनं धावायला लागत नाही. आधी ते रांगायला लागतं. गगनयन मोहिम हे एखादं धावणारं बाळ असेल तर, एक्सियम-4 मोहिम हा रांगण्याचा टप्पा आहे, असा त्याचा अर्थ आहे."
राकेश शर्मांच्या अंतराळयात्रेपासून आतापर्यंत काय काय बदललं?पल्लव बागला यांचं असं मत आहे की, राकेश शर्मा जेव्हा अंतराळात गेले होते, तेव्हाचा काळ असा होता की, भारताचा अधिकतर कल रशियाच्या बाजूने होता.
"ते भारत-रशिया मैत्रीची मोहिम होती. त्यावेळी भारताने रशियाला पैसे दिलेले नव्हते."
"यावेळी शुभांशु शुक्ला एक्सियम-4 मिशन अंतर्गत जात आहेत. हे एक कमर्शियल मिशन आहे. यामध्ये इस्रो आणि नासा यांची भागीदारी नक्कीच आहे. मात्र, या भागीदारीमध्येही काही आर्थिक हितसंबंध असतात. कारण, एक्सियम-4 ही एक कमर्शियल कंपनी आहे."
तब्बल 40 वर्षांनी भारताचे दुसरे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला अंतराळात जात आहेत.
या घटनेबाबत माजी भारतीय हवाई दलाचे पायलट आणि अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा यांनी म्हटलंय की, पुन्हा एखादा भारतीय अंतराळात पाऊल ठेवत असल्याचं वृत्त ऐकण्यासाठीची प्रतीक्षा मी गेल्या 41 वर्षांपासून करतो आहे.
याबाबत बीबीसी तमिळशी बोलताना ते म्हणाले की, "मला फार आनंद होतोय. भारतीय अवकाश क्षेत्रासाठी हा नक्कीच एक अत्यंत महत्त्वाचा असा क्षण आहे."
पुढे ते म्हणाले की, "जेव्हा मी अंतराळात गेलो होतो, तेव्हा सगळं काही नवं होतं. संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे होतं. विशेषत: संपूर्ण भारत या घटनेकडे लक्ष ठेवून होता."
"आता सध्याचा काळ हा तांत्रिकदृष्ट्या आधुनिक आणि विकसित असा आहे. त्या पार्श्वभूमीवर, अंतराळ प्रवासामध्येही बरेच मुलभूत असे बदल झालेले आहेत. मात्र, तरीही त्यातील आव्हाने अद्यापही कायम आहेत," असंही ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)