- डॉ. मालविका तांबे
पावसाळा आला, वातावरण थोडं थंड झाले की सगळ्यांनाच आनंद होतो, पण घराबाहेर पडायचे झाले की हाच पाऊस नकोनकोसा वाटायला लागतो. तास्-न्-तास ट्रॅफिकमध्ये उभे राहणे, चिंब भिजून घरी येणे हे तर या ऋतूत अनुभवाला येतेच, पण बरोबरच सगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार या काळात तोंड वर काढायला लागतात.
सर्दी-खोकला-ताप-अपचन-फूड पॉयझनिंग इत्यादींसारखे त्रास बऱ्याच लोकांना होताना दिसतात. आयुर्वेदानुसारही या काळात वात वाढतो तसेच पित्ताचेही असंतुलन होताना दिसते, या काळात शरीरात पचनशक्ती कमी झालेली असते, शरीराचे बल व रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते.
त्यामुळे या काळात आहार व दिनचर्येचे व्यवस्थित पालन करणे अत्यंत गरजेचे असते. स्वास्थ्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने आपण आज काही आहार व दिनचर्येशी संबंधित टिप्स बघू या.
पावसाळ्यात फारशी तहान लागत नाही. पण आवर्जून मध्ये मध्ये पाणी पिणे आवश्यक असते.
शक्यतो पावसाळ्यात गरम पाणी पिणे जास्त उत्तम.
पिण्याचे पाणी फक्त फिल्टर करून वापरण्यापेक्षा उकळून घेणे जास्त उत्तम. या काळात सुवर्णसंस्कारित जल पिण्याने सर्व प्रकारच्या संक्रमणापासून संरक्षण व्हायला मदत होते. सुवर्णसंस्कारित जल कसे करावे तसेच पाणी किती वेळ उकळावे या सविस्तर माहितीसाठी डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवर मिरॅकल वॉटर हा व्हिडिओ नक्की बघावा.
सकाळच्या वेळी गरम पाणी पिणे उत्तम. पाण्यात चवीपुरते मीठ, काळी मिरी, आले व पिंपळी घालून दोन मिनिटे उकळून गाळून घेतलेले अधिक चांगले. असे पाणी पचनासाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम असते.
पावसाळ्याच्या काळात फळांचे रस घेण्यापेक्षा ताजी, स्वच्छ फळे कापून खाणे अधिक इष्ट असते. सकाळच्या न्याहारीत वा दुपारच्या जेवणात फळांचा समावेश नक्की करावा.
पावसाळ्याच्या काळात कुठल्याही प्रकारचे कार्बोनेटेड पेय टाळणेच बरे. अशा पेयांमुळे शरीरात अपचन वाढते व या पेयांत असलेल्या रसायनांमुळे शरीराच्या चयापचय क्रिया बिघडतात.
बाजारात मिळणारी सगळ्या प्रकारची पेये टाळणे बरे. कारण ही पेये बनविताना स्वच्छतेची काळजी घेतली गेली नसल्यास यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे संक्रामक रोग होण्याची शक्यता असते.
बाजारात मिळणारा बर्फ टाळणे बरे, पेय पदार्थात बर्फ टाकण्याची इच्छा असल्यास घरी केलेला बर्फ वापरणे अधिक चांगले.
दिवसभरात २-३ वेळा माइल्ड चहा घेतला तर चालतो. चहा बनविताना यात गवती चहा, तुळस, लवंग, दालचिनी वगैरे आपल्या आवडीनुसार टाकता येतात. कफ झाला असला वा ताप आलेला असला तर असा चहा उपयोगी ठरतो.
संतुलन सॅन अमृत पासून बननविलेला हर्बल टी सुद्धा या ऋतूमध्ये घेण्याने सर्दी-खोकला वगैरे त्रासांना प्रतिबंध करण्यास उपयोगी ठरतो. तसेच सर्दी-खोकल्याचा त्रास थोड्या प्रमाणात होत असेल तर संतुलन फॉर्म्युला के २ पासून बनविलेला काढा घेण्याचा अधिक उपयोग होतो.
रात्रीच्या वेळच्या आहारात भाज्यांचे सूप, कुळथाचे सूप, बार्ली सूप, मुगाच्या डाळीचे सूप यांचा नक्की समावेश असावा.
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात जुने धान्य, जुना तांदूळ वापरणे उत्तम असते. तसे शक्य नसल्यास ही धान्ये भाजून घ्यावी. पचनाच्या दृष्टीने गव्हाचे पीठ नक्की भाजून घ्यावे. पोळ्यांऐवजी गाकर, दशम्या खाल्ल्यास पचनाला सोप्या असतात.
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात मधाचा वापर नक्की करावा. चहा निवत आल्यावर त्यात साखरेऐवजी मध टाकणे, फुलका वा पोळीबरोबर मध खाणे, कोमट पाण्याबरोबर मध घेणे हे पावसाळ्यात आवर्जून करावे.
पावसाळ्यात भूक कमी लागत असल्यास वा काहीतरी चटपटीत खावे असे वाटत असल्यास गरमागरम रस्सम खाणे उत्तम. रस्सम हे टोमॅटो, काळी मिरी, कढीपत्ता वगैरे वापरून केलेले एक दक्षिण भारतीय सूप आहे. रस्सम प्यायल्याने पचन सुधारते, शरीराला भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी मिळतात तसेच श्र्वसनसंबंधित त्रास अल्यास कमी व्हायला मदत मिळते.
पावसाळ्यात बाहेर गेले की मक्याचे कणीस खाण्याचा प्रघात दिसतो. पण या काळात पचनशक्ती कमी असल्यामुळे शक्यतो फार प्रमाणात कणीस खाऊ नये. कणीस खायचे झाल्यास ते व्यवस्थित भाजलेले असावे, त्यावर लिंबू, मीठ, तिखट लावून गरम गरम खाल्ल्यास पचायला थोडे सोपे पडू शकते. ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांनी मका कमी प्रमाणात खाणेच बरे.
पावसाळ्यात गरम गरम चहाबरोबर भजी खाण्याची पद्धत रूढ आहे. पण पावसाळ्यात अग्नी मंद असल्यामुळे शक्यतो तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळणेच बरे. त्यातल्या त्यात खायचे झालेच तर भजी घरी केलेली असावी.
रस्त्यावर मिळणारे चाट, पाणी-पुरी खाणे पावसाळ्याच्या दिवसांत शक्यतो टाळणेच बरे.
पावसाळ्यात पचनशक्ती मंदावल्यामुळे मांसाहार टाळणे चांगले.
भारतीय संस्कृतीत या काळात बरेच उपवास करण्याची प्रथा दिसते. ज्यांना असे उपवास आवडत नाहीत किंवा माहीत नाहीत त्यांनी कमीत कमी इंटरमिटंट फास्टिंग तरी करावे.
या काळात रात्री उशिरा जेवणे टाळणे तसेच दोन जेवणांमध्ये व्यवस्थित अंतर असणे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते.
पावसाळ्यात वापरण्यात येणाऱ्या भाज्यांची स्वच्छतेच्या दृष्टीने नीट काळजी घेणे उत्तम. पावसाळ्यात शक्यतो फळभाज्या खाणे अधिक चांगले. पालेभाज्या खाणे टाळावे. पालेभाज्या खायच्या झाल्यास त्या मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवून नंतर स्वच्छ धुऊन घेतलेल्या असाव्या. पालेभाज्या, कोबी, कॉलिफ्लॉवर, वांगे या सगळ्यांच्या उत्पादनाच्या वेळी रासायनिक द्रव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला असते. पावसाळ्यात तर अशा रासायनिक द्रव्यांच्या फवारण्यांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे या भाज्या पावसाळ्यात टाळणेच बरे.
पावसाळ्यात फळे घरी आणल्यावर मिठाच्या पाण्यात वा पोटॅशियम परमँगनेटच्या सौम्य द्रावणात काही वेळासाठी बुडवून ठेवाव्या किंवा फळे-भाज्या धुण्याच्या द्रावणाने धुवाव्या,
सध्याच्या युवा पिढीत या काळात बाहेर जाऊन चायनीज खाण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. चायनीज स्टॉल वर वापरलेल्या गोष्टी अनेकदा निकृष्ट स्तराच्या असतात, तसेच यात वापरलेले कृत्रिम रंग, चुकीचे तेल या गोष्टी आजारपणासाठी आमंत्रण करणाऱ्या असतात.
पावसाळ्यात भिजून घरी आल्यावर लगेच केस वाळवणे, ओले कपडे बदलून कोरडे कपडे घालणे आवश्यक असते. शक्यतो संतुलन टेंडरनेस किंवा संतुलन प्युरिफायरसारखा धूप लगेच तळपायांना, नाकाला वा कानांना करावे. यामुळे इन्फेक्शनपासून संरक्षण व्हायला मदत मिळते.
घरातल्या वातावरणाचा दमटपणा कमी करण्यासाठी डिह्यूमिडिफायर वापरणे, तसेच दिवसातून दोनदा संपूर्ण घरात संतुलन प्युरिफायर, वा संतुलन परिवारकवच धूप करणे महत्त्वाचे ठरते. घरातील लहान मुलांच्या कपड्यांना धूपन करणेही चांगले.
अनोळख्या पाण्याच्या ठिकाणी जाणे आयुर्वेदात चुकीचे सांगितलेले आहे. या काळात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक जण पाण्याच्या ठिकाण जातात व नकळत अपघात होताना दिसतात. त्यामुळे सामाजिक दृष्ट्याही अशा गोष्टी टाळणेच बरे.
एकूणच पावसाळ्यात स्वतःची नीट काळजी घेतली तर पावसाळा आरोग्यदायी व आल्हाददायक ठरू शकेल.