भारतीय कसोटी संघाला जे जमलं नाही ते अंडर 19 टीमने करुन दाखवलं आहे. आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने काउंटी ग्राउंड, होवेमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंडर 19 इंग्लंडचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. यासह भारतीय क्रिकेट संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंदु या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. तर इतरांनीही चांगली कामगिरी करत भारताच्या विजयात योगदान दिलं.
वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे या सलामी जोडीने कडक सुरुवात केली आणि टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. वैभव-आयुषने 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वैभव आऊट झाला. वैभवने 19 बॉलमध्ये 252.63 च्या स्ट्राईक रेटने 48 रन्स केल्या. वैभवने या खेळीत 5 खणखणीत षटकार तर 3 चौकार लगावले. वैभवनंतर कर्णधार आयुषही झटपट आऊट झाला. आयुषने 30 चेंडूंमध्ये 4 फोरसह 21 धावा केल्या.
त्यानंतर विहान मल्होत्रा आणि मौल्यराजसिंग चावडा या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 20 धावा जोडल्या. मौल्यराजसिंग याने 15 बॉलमध्ये 16 रन्स केल्या. विहान आणि अभिज्ञान कुंदु या जोडीने चौथ्या विकेटसाठी 24 धावांची भागीदारी केली. भारताने विहानच्या रुपात चौथी आणि अखेरची विकेट गमावली. विहानने 21 चेंडूत 18 धावा केल्या.
त्यानंतर अभिज्ञान आणि राहुल कुमार या जोडीने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 55 धावा जोडल्या. अभिज्ञानने 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 45 धावा केल्या. तर राहुल कुमारने 25 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान दिलं.
त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून एंड्रयू फ्लिंटॉफ याचा मुलगा रॉकी याने सर्वाधिक 56 धावांचं योगदान दिलं. तर इसाक मोहम्मद याने 42 धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता भारताच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाने अशाप्रकारे धारदार बॉलिंगच्या जोरावर इंग्लंडला 42.2 ओव्हरमध्ये 174 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर भारताने 26 ओव्हरआधीच सामना जिंकला. टीम इंडियाने 24 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 178 धावा केल्या आणि पहिला विजय साकारला.