73593
रक्तदान चळवळीतून सामाजिक सुसंवाद
प्रकाश तेंडोलकर ः वेंगुर्लेत व्याख्यानमाला, कार्यशाळेस प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः रक्तदान चळवळीमुळे सामाजिक सुसंवाद साधला जातो. त्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानने मित्रसंस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० हून अधिक रक्तदान शिबिरे, अवयवदान व देहदान प्रक्रिया पूर्ण केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत दुर्मीळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुपच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० लोकांचा शोध घेतला आहे, असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी वेंगुर्ले येथे केले.
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण विभाग, बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत तेंडोलकर बोलत होते. महाविद्यालयात रक्तदान, देहदान व अवयवदानाबाबत सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. केळकर, प्रकाश तेंडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सोनाली सावंत, बहि:शाल शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. संजीव लिंगवत, अखिल भारतीय बौद्ध समितीचे अध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वयक संजय पिळणकर, विभागीय संघटक यशवंत गावडे, डॉ. रवींद्र गरुड, गोवा समन्वयक अॅलिस्टर ब्रिटो आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी वर्गाने रक्तदान, अवयवदान व देहदान या विषयावर आधारित व्याख्यानात मोठ्या संख्येने उपस्थित राहून व संवाद साधून माहिती घेतली. डॉ. संजीव लिंगवत यांनी प्रास्ताविक, तर डॉ. दीपाली देसाई यांनी स्वागत केले. डॉ. सतीश पाटील यांनी आभार मानले.