उजळल्या ज्योती
esakal June 29, 2025 10:45 AM

ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com

जसा चालण्याच्या वाटेवर प्रकाश लागतो, तसाच जगण्याच्या वाटेवरही तो आवश्यक असतो आणि हा प्रकाश अर्थात ज्ञानाचा असतो. म्हणूनच नामदेव महाराज ‘ज्ञानदीप लावू जगी’ असं म्हणतात. हीच प्रतीकात्मकता लक्षात घेऊन कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून होते. समईच्या ज्योती उजळल्या की सगळंच तेजाळून निघतं.

पुण्याबाहेर भटकंतीला गेलो होतो, तेव्हा रात्री जेवत असताना आमच्या हाॅटेलच्या डायनिंग हाॅलचे लाइट काही क्षणांसाठी गेले. अगदी साधीच गोष्ट होती; पण स्वाभाविकपणे लहान मुलांच्या रिॲक्शन्स ‘ओह नो’ वगैरे अशा... कारण लाइट जाण्याची सवयच नाही; पण यानिमित्ताने मी माझ्या लाइट गेल्यावरच्या आठवणी, गमती-जमती आर्यला सांगितल्या.

मला जसं आजी-आजोबा किंवा आई-बाबांकडून त्यांचं बालपण ऐकायला आवडायचं, तसंच आताच्या मुलांना आवडतं. आपला सूर मात्र ‘तेच कसं भारी होतं’ असा नसला म्हणजे झालं.

मला आठवतंय लाइट गेली, की सोसायटीतील सगळ्या घरातून लहान मुलांचा ओरडल्याचा मोठा आवाज यायचा. ते ओरडणं घाबरण्याचं नाही, तर आनंदाचं असायचं. कारण अभ्यासात ‘ब्रेक’ मिळालेला असायचा. मग घराघरातून मेणबत्ती, टाॅर्च असे उजळले जायचे. एकीकडे आम्ही मुलं अंगणात जमायचो, मग सुरू व्हायची ती अंताक्षरी किंवा भूताच्या गोष्टी. हे सगळं रंगात आलेलं असताना नेमकी लाइट आली, की आमचं अरेऽऽ म्हणजे ‘ओह नो’ व्हायचं आणि लाइट जाण्याचा कालावधी फार लांबला, तर जेवायला घरी. शिवाय कमी उजेडात अभ्यास करणं आलंच. त्यात उकडत असेल तर पेपरने वारा घ्यायचा; पण तेही आवडायचं. लाइट जाणं हा रुटीनमधला बदल असल्यामुळे तो असा साजरा केला जायचा.

आता सोसायटीत जनरेटर आणि घरात इन्व्हर्टर असल्यावर हा अनुभव कित्येक वर्ष घेतला नाही; पण आठवण मात्र येत असते. अशीच एक आठवणीतली कविता -

आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती

झाले इवली मग पणती

घरांघरांतून मिणमिणती

कविवर्य वि. म. कुलकर्णी यांची ही कविता दिव्याचा प्रवास सांगत अगदी ‘आता झाले मी बिजली’पर्यंत येऊन थांबते. आज त्यातही अजून बदल होत मोबाईलच्या टाॅर्चची किंवा रिंगलाइटचीसुद्धा भर पडली आहे; पण तरीही दिवाळीतली छोटी पणती, निरांजन, समई या दिव्यांना आपल्या संस्कृतीने आजही जपलंय. निरांजनासाठी लागणाऱ्या वाती आजीने शिकवल्या होत्या. हे निरांजन देवापाशी आणि तुळशीपाशी लावून तिन्हीसांजेला शुभंकरोति म्हटलं, की प्रसन्न वाटतं. कातरवेळी जे आजच्या भाषेत ‘लो’ वाटतं, त्यावर यामुळे अगदी वेळेत मात करता येते आणि त्याचबरोबर दिवाळीच्या वेळीही बाकी कितीही शोभेच्या माळा लावल्या, तरी पणत्या आणि आकाशकंदील यांचं दिवाळीतील स्थान ध्रुवताऱ्यासारखं अढळ आहे. कधीतरी आकाशकंदील घरीही केलेला आठवतोय आणि पणत्या रंगवणं हे तर मेडिटेशन आहे. अशाच पणत्या रंगवताना आर्यला एक पणतीचीच गोष्ट सांगितली होती.

आटपाट नगरात दिवाळीच्या निमित्ताने सर्वात सुंदर दिवे लावण्याची स्पर्धा घेण्यात येते. कोणता दिवा कुठे लावायचा हे ज्याने त्याने ठरवायचं. जो तो आपल्या कल्पकतेनुसार आणि ऐपतीनुसार दिव्यांची योजना करतो.

कुणी दिवा आकाराने सर्वात मोठा असेल असा प्रयत्न करतो, कुणी किमतीने मौल्यवान असेल हे पाहतो, कुणी कलाकुसरीवर भर देतो. जेव्हा विजेत्याचं नाव घोषित होतं, तेव्हा सगळेच आश्चर्यचकित होतात. एका शेतकऱ्याने हातानेच मातीची ओबडधोबड पणती तयार केलेली असते. या पणतीला बक्षीस? पण परीक्षक सांगतात, की दिवा हा प्रकाश देण्यासाठी असतो. अनेकांचे दिवे सुंदर होते; पण बहुतेकांनी ते अंगणात किंवा मंदिरात ठेवले, जिथे आधीच प्रकाशच नव्हे, तर झगमगाट होता; पण अंधाऱ्या पायवाटेवर दिवा लावून या शेतकऱ्याने अनेक वाटसरूंना मार्ग दाखवला. कोणतीही गोष्ट करताना ती उपयुक्त ठरली, तर त्याचं मोल नक्कीच वाढतं. मलाही हा विचार पटला आणि आवडला.

जसा चालण्याच्या वाटेवर प्रकाश लागतो, तसाच जगण्याच्या वाटेवरही तो आवश्यक असतो आणि हा प्रकाश अर्थात ज्ञानाचा असतो. म्हणूनच नामदेव महाराज ‘ज्ञानदीप लावू जगी’ असं म्हणतात. हीच प्रतीकात्मकता लक्षात घेऊन कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून होते. हा अनुभव माझ्यासाठी म्हटलं तर नेहमीचा आणि प्रत्येक वेळी नवा असतो. कधी टेबलवर छोटी समई असते, तर कधी उंच समई असते. फुलांच्या माळेने ती कधी सजवलेली असते, तर कधी जोडीला सुंदर रांगोळी असते. अशा या समईच्या ज्योती उजळल्या की ती फुलं, ती रांगोळी सगळंच तेजाळून निघतं; पण त्याचबरोबर एक स्वतंत्र लेख होईल, इतके किस्से इथे घडू शकतात. कधी समई असते; पण मेणबत्ती आणि काडेपेटीच नसते वा सापडत नसते. प्रेक्षकांची चुळबूळ, फोटोग्राफरची घालमेल, मान्यवरांनी प्रयत्नपूर्वक बाळगलेला संयम आणि सूत्रसंचालकाला ‘आता मी अधिक काय बोलू’ हा पडलेला प्रश्न... असा प्रसंगही कधी अनुभवता येतो.

एकदा व्याख्यानापूर्वी दीपप्रज्वलन करताना तिथे मेणबत्ती नव्हती, तर फक्त काडेपेटी होती. मेणबत्ती जशी लावून पाहुण्यांच्या हातात देतात, तशी इथे काडी पेटवून देत होते आणि ते चटके मला तरी सोसत नव्हते. असं दोन-तीनदा झाल्यावर एक जण म्हणाले, ‘‘ताई आता तुम्हीच काडी लावा; पण माझी पहिलीच काडी मोडली आणि दुसरी विझली! ताई, तुम्ही काड्या लावत राहा, भरपूर आहेत बघा.’’ मग काय कधी नव्हे ते ‘काड्या लावणे’ कृतीचा अनुभव घेतला आणि मग मात्र समईच्या शुभ्र कळ्या छान उजळल्या.

असे सण-समारंभ सोडले, तर विजेच्याच दिव्यांचा आता वापर होतो; पण चिमणी आणि काचेचा कंदील हे मी लहानपणी पाहिलं आहे. त्या काचेचा चटकाही अनुभवला आहे. कंदिलाच्या प्रकाशात वावरायला मर्यादा तर येणारच. प्रवास करणं तर किती कठीण! पूर्वीच्या काळचे एक गुरू आपल्या शिष्याला एक पत्र देऊन ते दुसऱ्या गावी पोचवायला सांगतात. शिष्य विचारतो, ‘‘गुरुदेव पण वाटेत रात्र तर नक्की होणार, मग या कंदिलाच्या प्रकाशात कसा पुढे जाऊ?’’ गुरुदेव म्हणतात, ‘‘अरे, पावलापुरता प्रकाश तर मिळेल ना. तेवढा पुरेसा असतो. त्याच उजेडात पुढे पुढे जात राहा.’’ कधी कधी फार पुढच्या योजना ठरवून मार्ग आखण्यापेक्षा पूर्ण खात्रीने टाकलेलं एकेक पाऊल इच्छित स्थळी नक्की घेऊन जातं. हा खूप छान विचार ही कंदिलाची गोष्ट देऊन जाते.

खरंतर या कंदिलामुळेच विजेचे दिवे येण्यापूर्वी लवकर नीजानीज व्हायची. जेवणंही साहजिकच सूर्यास्तापूर्वी व्हायची आणि आता झालेल्या सुधारणांचा फायदा होत असला, तरी कधी कामासाठी, तर कधी मनोरंजनासाठी जागरणं घडतात, जेवणाच्या वेळाही काहीही असू शकतात आणि त्याचा आरोग्यावर परिणाम तर होतोच. असो; पण आता कंदील, चिमण्या, मशाली या गोष्टी दिसतात त्या नाटक आणि सिनेमात. सिनेमासाठी ‘लाइट, कॅमेरा, ॲक्शन’ या शब्दांचं स्थान सांगायलाच नको. तसाच रंगभूमीवरही ‘लाइट’ प्रसंगानुरूपही महत्त्वाचा आहेच आणि हो, ‘ब्लॅकआऊट’ही कथेसाठी तेवढंच गरजेचं.

आपण जगाचा रंगभूमी म्हणून विचार करतो, तेव्हा त्या दृष्टीनं पाहताना मला वाटतं, की रंगभूमीवरचे कलाकार प्रेक्षकांसाठी काम करत असले, तरी प्रेक्षक अंधारात असतात आणि कदाचित म्हणूनच नट चांगल्या प्रकारे भूमिकेवर लक्ष केंद्रित करतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल, याचा विचार करत आपण आपली भूमिकाच अंधारात चाचपडत पार पडतो; पण संवाद म्हणवून घेणारा दिग्दर्शक आपल्याच आत प्रकाशमान आहे असा विश्वास ठेवला ना, तर आपल्यावरच ‘स्पाॅटलाइट’ पडला आहे हा अनुभव कधी ना कधी आल्याशिवाय रहाणार नाही. ब्लॅकआऊट होण्याचीसुद्धा तयारी हवीच; पण पुन्हा ‘लाइट’ पडल्यावर नव्या अनुभवाचं स्वागत करण्यासाठी सतर्क असायला हवं. नाटकाचा केंद्रबिंदू होण्याची संधी प्रत्येक नटाला मिळेलच असं नाही; पण आपल्या आयुष्याचा ‘लीड रोल’ आपण करतच असतो. एक्झिट घेण्यापूर्वी स्पाॅटलाइट आपल्यावर पडणं हे आपल्याच हातात आहे. मग समोरच्या अंधारातून टाळ्या वाजत राहतीलच आणि अंतरात उजळलेली दीपज्योतही तेवत राहील अखंडपणे! शुभं भवतु.

(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.