ऑपरेशन सिंदूरमध्ये जोरदार फटका खाल्यानंतर पाकिस्तानमध्ये भारताची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पाकिस्तान पीपुल्स पक्षाचे नेते बिलावल भुट्टो यांनी संसदेत त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा उल्लेख करत भुट्टो म्हणाले, पाकिस्तानवरील धोका अजूनही टळलेला नाही. सिंधू जल वाटप कराराचा प्रश्न आहे. यामुळे भविष्यात दोन्ही देशांमध्ये संघर्ष होणार आहे. यामुळे पाकिस्तानने युद्धाची तयारी केली पाहिजे, असे बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यान बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले, भारत अजूनही म्हणत आहे की हा फक्त ट्रेलर होता. बाकीचा चित्रपट पुढे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले, भारताचे पंतप्रधान पाकिस्तानच्या तरुणांना ‘रोटी खाओ, वरना गोली खाओ’, असे सांगत आहेत. आम्हाला युद्ध नको आहे. पण भारताने जर पाण्याचा वापर शस्त्र म्हणून केला गेला तर पाकिस्तानला कारवाई करणार आहे. आम्ही पूर्वीप्रमाणेच भारताला पराभूत करण्याच्या परिस्थितीत आहोत.
भुट्टो यांनी भारतावर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, भारताकडे दोन पर्याय आहेत. पाणी न्याय्य पद्धतीने वाटून द्या, अन्यथा आम्ही सर्व सहा नद्यांचे पाणी घेऊ. भारत आणि पाकिस्तानने १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली. हा करार भारत आणि पाकिस्तानमधील सहा नद्यांच्या पाण्याचे वाटप प्रकरणात आहे. त्यापैकी तीन नद्या भारतात जातात आणि तीन पाकिस्तानला जातात.
सिंधू पाणी करारावर बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले की, भारताने सिंधू जल करार रद्द करण्याची धमकी दिली आहे. हा करार पूर्ववत करणार नाही, असे भारताकडून वारंवार सांगण्यात येत आहे. या परिस्थितीत पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरू करावी. सिंधू जलकरार रद्द केल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान युद्ध होऊ शकतो, असे भुट्टो यांनी म्हटले.