प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
मुंबई-कल्याण-डोंबिवलीत नाक्यानाक्यावर वडापाव मिळतो. अनेक ठिकाणचे वडापाव गेल्या काही वर्षांत नावारूपाला आले आहेत. मात्र कल्याणच्या वझे कुटुंबाने आपल्या वड्याची चव आणि लोकप्रियता वेळीच ओळखली आणि त्याचे अधिकृत पेटंट मिळवले. आज ‘खिडकी वडा’च्या फक्त फ्रेंचायझी नाहीयेत तर कोकणातील दापोलीमध्ये नऊ महिने टिकेल आणि वेगवेगळे पदार्थ तयार करता येतील असा ‘खिडकी वडा मसाला’ बनवण्याची फॅक्टरी उभी राहिली आहे.
मसाले, लोणची, पापड आणि किराणा मालाच्या वस्तूंचे ब्रॅण्ड आपल्या सर्वांच्या परिचयाचे असतात; पण रस्त्यावर मिळणाऱ्या एखाद्या पदार्थाचं ब्रॅण्डिंग करणं, त्याचा ट्रेडमार्क बनवणे याला दूरदृष्टीच असावी लागते. एका मराठी कुटुंबाने याचा तीन दशकांपूर्वीच विचार केला आणि तो प्रत्यक्षात उतरवलादेखील. विशेष म्हणजे या ब्रॅण्डचे नामकरण लोकांनीच केले होते, तेसुद्धा ट्रेडमार्क मिळविण्याच्या वीस वर्षे आधीच. हा ब्रॅण्ड म्हणजे कल्याणचा ‘खिडकी वडा’. फक्त महाराष्ट्रातच नाही तर इंग्लंड आणि अमेरिकेतही ‘खिडकी वडा’ पोहोचला आहे.
मुंबई-कल्याण-डोंबिवलीत नाक्यानाक्यावर वडापाव मिळतो. अनेक ठिकाणचे वडापाव गेल्या काही वर्षांत नावारूपाला आले आहेत. मात्र कल्याणच्या वझे कुटुंबाने आपल्या वड्याची चव आणि लोकप्रियता वेळीच ओळखली आणि त्याचे अधिकृत पेटंट मिळवले. आज ‘खिडकी वडा’च्या फक्त फ्रेंचायझी नाहीयेत तर कोकणातील दापोलीमध्ये नऊ महिने टिकेल आणि वेगवेगळे पदार्थ तयार करता येतील असा ‘खिडकी वडा मसाला’ बनवण्याची फॅक्टरी उभी राहिली आहे. हा मसाला सातासमुद्रापार बटाटा वडाप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवतोय.
यशवंत वझे हा कल्याणचे मोरेश्वर वझे यांचा सर्वात धाकटा आणि हुशार मुलगा. आर्थिक हलाखीमुळे यशवंत यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पत्करावी लागली. १९५०च्या उत्तरार्धात दादर येथील कोहिनूर मिल येथे क्लार्कची नोकरी करत करतच त्यांनी पोटापाण्यासाठी असंख्य उद्याेग केले. १९६८ मध्ये यशवंत वझे यांचा वर्ध्याच्या शोभा गोंधळेकरांशी (उमा) विवाह झाला. उमा यांच्या रूपाने यशवंत यांच्या धडपड्या वृत्तीला साजेशी जोडीदार मिळाली. लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी यशवंत आणि उमा यांनी लग्नानंतर लगेचच बटाटे वडे विकण्याचा निर्णय घेतला. कल्याणमध्ये टिळक चौकाकडून अहल्याबाई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी वझे कुटुंबीयांचा जुन्या पद्धतीचा वझे वाडा होता. या वझे वाड्याच्या दिंडी दरवाजातून आत शिरताना उजव्या बाजूस असलेल्या खिडकीतून यशवंत आणि उमा यांनी बटाटा वडा विक्रीच्या व्यवसायाला प्रारंभ केला. वाड्याच्या खिडकीतून मिळणारा घरगुती वडा अल्पावधीतच कल्याणकरांच्या पसंतीस उतरला. वझे यांनी आपल्या व्यवसायाचे नामकरण केले नव्हते, मात्र लोकांनीच त्याला ‘खिडकी वडा’ असे नाव देऊन टाकले आणि कालांतराने तेच ब्रॅण्डनेम झाले.
‘खिडकी वडा’च्या वड्याची पाककृती उमा वझे यांची आहे. आज ५६ वर्षांनीदेखील तीच पाककृती वापरून वडा तयार केला जात आहे. हिरवी मिरची, लसूण, आलं, मीठ, कांदा, कढीपत्ता, जिरं, मोहरी, हळद आणि तेल या घटक पदार्थांपासून तयार झालेला मसाला बटाटा वड्यासाठी वापरला जातो. वझे कुटुंबीयांनी आपली मसाल्याची पाककृती सिक्रेट ठेवलेली नाही. तरीही त्यांची मसाला बनवण्याची पद्धत आणि प्रमाण यामुळे ती अजूनही कुणालाही जमल्याचं दिसत नाही. वड्यासाठी इंदौर बटाट्याचा वापर केला जातो. हा बटाटा गोड लागत नाही किंवा त्याला आंबूस वास येत नाही. शिवाय मार्केटमध्येही सहज उपलब्ध असतो. अशाप्रकारे सर्व बाजूंचा विचार करून या बटाट्याची निवड करण्यात आली आहे.
बटाटा वडा म्हटलं की त्यासोबत मिरची किंवा चटणी हवीच. ‘खिडकी वडा’सोबत मिळणारी लाल सुकी चटणीदेखील लोकांच्या आवडीची आहे. बेसनाचा चुरा, लसूण, लाल तिखट, मीठ इतक्याच घटकांपासून दररोज ताजी चटणी तयार केली जाते. अलीकडे हिरव्या चटणीचा ठेचा आणि चिंच-गुळाची गोड चटणीदेखील वड्यासोबत दिली जाऊ लागली आहे. नावाप्रमाणेच पूर्वी खिडकीतून फक्त बटाटा वडा मिळायचा. त्यानंतर नव्वदच्या दशकात वड्यासोबत पावदेखील मिळू लागला. वड्यासोबत दिला जाणारा पाव दिवसातून तीन वेळा येतो. जेणेकरून गरमागरम वड्यासोबत ताजा पावच ग्राहकांना मिळेल.
नव्वदच्याच दशकात वझे बंधूंचे कल्याणमध्ये भोजनालयदेखील होते. तिथे अवघ्या पाच रुपयांमध्ये शाकाहारी थाळी मिळत असे. त्या जेवणाची इतकी ख्याती होती की कल्याणमध्ये नाटकाचे प्रयोग आणि चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी येणारे अनेक नामवंत कलाकार तिथे जेवायला जात. यशवंत आणि उमा यांनी सुरू केलेला व्यवसाय त्यांची दोन मुले नीलेश आणि शैलेश यांनी केवळ वाढवला नाही तर त्याला वेगळी ओळख प्राप्त करून दिली. ‘खिडकी वडा’चे पेटंट मिळवण्यापासून भारतातील प्रमुख अन्न नियामक संघटना (FSSAI) आणि अमेरिकेच्या एफडीए करून ‘खिडकी वडा’ला मान्यता मिळालेली आहे.
गेल्या काही वर्षांत ‘खिडकी वडा’च्या मेन्यूमध्ये कोथिंबीर वडी, मुगाची भजी आणि समोसा हे पदार्थदेखील समाविष्ट झालेले आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी मूलभूत घटक म्हणून ‘खिडकी वडा मसाला’च वापरला जातो. हा मसाला म्हणजे सर्व पदार्थांचा आत्मा आहे. कोथिंबीर वडी असो वा मूगडाळ भजी सर्व पदार्थ गरमा गरमच तयार करून दिले जातात. निर्मिती आणि वितरणाची जबाबदारी असलेले नीलेश यांनी काही वर्षांपूर्वी कोकणातील दापोली येथे ‘खिडकी वडा मसाला’ तयार करण्याची फॅक्टरी सुरू केली आहे. या फॅक्टरीमध्ये दररोज हजारो किलो मसाला तयार होतो आणि राज्य व परदेशात निर्यात केला जातो. नऊ महिने वैधता असलेला हा मसाला अनेक चाचण्या केल्यानंतर, विविध पाककृतींसाठी वापरून पाहिल्यानंतरच बाजारात आणला गेलाय. शाकाहारी मांसाहारी कालवण, बटाटा भाजी, वांग्याचे भरीत, कढी अशा असंख्य पदार्थांमध्ये हा मसाला वापरूनच चवदार पाककृती तयार करता येतात. पाकीटबंद मसाला उघडल्यानंतर काचेच्या बरणीत काढून ठेवला तरी नऊ महिने त्याला काहीही होत नाही, असा वझे यांचा दावा आहे.
‘खिडकी वडा’च्या विक्री-व्यवसायाची धुरा शैलेश सांभाळत असून तीन पेट्रोलपंप (ठाणे), डोंबिवली, कोथरूड (पुणे), बदलापूर, पंढरपूर, बार्शी, इंदौर येथे खिडकी वडाच्या शाखा आहेत. या सर्व शाखांमध्ये आधुनिक उपकरणं उपलब्ध आहेत. बटाटे सोलण्याच्या मशीनपासून ते तळण्यासाठीच्या अत्याधुनिक शेगड्या आहेत. वड्याच्या प्रमाणीकरणाच्या दृष्टीने हे करण्यात आले आहे.
मेन्यूमध्ये असंख्य पदार्थ असतात तेव्हा एखादा पदार्थ बिघडला तर हरकत नसते, परंतु एकच पदार्थ जेव्हा व्यवसायाची ओळख असतो तेव्हा त्यामध्ये कोणतीही तडजोड करता येत नाही. वझे कुटुंबीयांनी गेली ५६ वर्षे ही चव जपली आहे.