तंत्रज्ञानाच्या जगात AI ची जादू, IT क्षेत्रात मोठी तेजी, दरमहा फ्रेशर्स कमवतात ‘एवढे’ पैसे
Marathi July 04, 2025 11:25 AM

आयटी क्षेत्रः भारतातील आयटी क्षेत्र (IT sector) पुन्हा एकदा वेगाने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. एआय आणि डिजिटल कौशल्यांच्या वाढत्या मागणीमुळं या क्षेत्रात मोठी तेजी दिसत असल्याचे इंडीडच्या ‘पेमॅप’ अहवालानुसार समोर आलं आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या फ्रेशर्सना सरासरी 28600 रुपये पगार मिळत आहे आणि अनुभवी व्यावसायिकांना 68900 रुपयापर्यंतचा पगार मिळत आहे. उत्पादन आणि दूरसंचार क्षेत्रे देखील मागे नाहीत. उत्पादन आणि प्रकल्प व्यवस्थापन भूमिकांमध्ये सर्वाधिक कमाई होत आहे.

भारतीय नोकरी बाजारपेठेत आयटी आणि आयटीशी संबंधित सेवा (आयटीईएस) क्षेत्र पुन्हा एकदा एक प्रमुख शक्ती बनले आहे. जागतिक नोकरी शोध प्लॅटफॉर्मच्या पेमॅप सर्वेक्षण अहवालानुसार, फ्रेशर्स असोत किंवा अनुभवी व्यावसायिक, पगाराच्या बाबतीत आयटी क्षेत्राने सर्वांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. या क्षेत्रात नवीन येणारे दरमहा 28600 रुपयांपर्यंत कमाई करत आहेत, तर 5 ते 7 वर्षांचा अनुभव असलेले व्यावसायिक 68900 रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे डिजिटल आणि एआय-आधारित भूमिकांची वाढती मागणी.

तंत्रज्ञानाच्या जगात एआयची जादू

तंत्रज्ञानाच्या जगात एआय आणि डिजिटल कौशल्यांची मागणी गगनाला भिडत आहे. यामुळेच आयटी क्षेत्रातील पगार सतत वाढत आहेत. केवळ आयटीच नाही तर उत्पादन आणि दूरसंचार सारखे क्षेत्र देखील पगाराच्या बाबतीत मागे नाहीत. या क्षेत्रांमध्ये, फ्रेशर्सना दरमहा 28100 ते 28300 रुपये पगार मिळत आहे, तर 5 ते 8  वर्षांचा अनुभव असलेले व्यावसायिक 67700 ते 68200 रुपये कमवत आहेत.

प्रवेश-स्तरीय नोकऱ्यांनाही चांगला पगार

जर आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटपासून एचआर अभियांत्रिकीपर्यंतच्या वेगवेगळ्या नोकरीच्या भूमिकांबद्दल बोललो तर, एंट्री-स्तरीय नोकऱ्यांमध्ये दरमहा 25000 ते 30500 रुपये पगार मिळतो. परंतु खरे चमत्कार म्हणजे उत्पादन आणि प्रकल्प व्यवस्थापन भूमिका. यामध्ये, 5 ते 8 वर्षांचा अनुभव असलेले लोक दरमहा 85500 रुपयांपर्यंत कमवत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे, UI/UX डिझाइन भूमिका आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसारख्या पारंपारिक तंत्रज्ञान भूमिकांशी स्पर्धा करत आहेत. वरिष्ठ UI/UX व्यावसायिकांचे वेतन दरमहा 65,000 रुपयांपर्यंत पोहोचत आहे.

नवीन शहरे नोकऱ्यांमध्ये आघाडीवर

इंडीडच्या अहवालात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. आता केवळ मोठी महानगरेच नाही तर हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद सारखी शहरे देखील नोकऱ्या आणि पगाराच्या बाबतीत आघाडीवर आहेत. या शहरांमधील पगार वाढ देशाच्या सरासरी पगार वाढीपेक्षा 15 टक्के जास्त आहे. खरं तर, भारताचे विक्री प्रमुख शशी कुमार म्हणाले की, पगाराचा ट्रेंड बदलत आहे. लोक आता अशी शहरे निवडत आहेत जिथे पगारासोबत राहणीमानाचा खर्चही संतुलित आहे. आता संधी फक्त मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित नाहीत तर लहान शहरे देखील संधी देत ​​आहेत.

महागाईने त्रस्त कर्मचारी

दरम्यान, पगारात वाढ होऊनही, अनेक कर्मचारी महागाईने त्रस्त आहेत. सर्वेक्षणात, 69 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांच्या शहरांमधील वाढत्या खर्चाप्रमाणे त्यांचे पगार कमी पडत आहेत. दिल्ली (96 टक्के), मुंबई (95 टक्के), पुणे (94 टक्के) आणि बेंगळुरू (93 टक्के) सारख्या मोठ्या महानगरांमध्ये ही तक्रार विशेषतः जास्त आहे. दुसरीकडे, कर्मचारी चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता सारखी शहरे अधिक परवडणारी मानतात. या शहरांमध्ये पगार आणि दैनंदिन खर्चातील संतुलन चांगले आहे.

2531 कर्मचाऱ्यांसोबत सर्वेक्षण

Indeed च्या या अहवालात 1311 नियोक्ते आणि 2531 कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियांचा समावेश आहे. हे सर्वेक्षण महामारीनंतरच्या अर्थव्यवस्थेतील पगाराचा ट्रेंड, क्षेत्रांची स्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी करण्यात आले. हा अहवाल केवळ पगाराचे आकडे देत नाही तर भारतातील नोकरी बाजार आता नवीन मार्गांवर वाटचाल करत आहे हे देखील सांगतो.

महत्वाच्या बातम्या:

Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमधील नैसर्गिक ओढे-नाले बुजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; पुणे पीएमआरडीएची घोषणा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.