वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
ब्राझीलमध्ये आज रविवारपासून सलग तीन दिवस ‘ब्रिक्स’ शिखर परिषद होत असून भारताच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पोहोचणार आहेत. ब्राझीलच्या दौऱ्याला जोडून ते अन्य चार देशांचा दौराही करत असून सध्या अर्जेंटिनामध्ये आहेत. ब्रिक्स परिषद संपल्यानंतर ते अंतिम टप्प्यात 9 जुलैला नामिबिया या देशाच्या दौऱ्यावरही जाणार आहेत. ‘ब्रिक्स’ परिषदेत पंतप्रधान मोदी पहलगाम येथील दहशतवादी हल्ला, पाकिस्तानकडून होणारे दहशतवादाचे पोषण, भारताचे ‘सिंदूर’ अभियान हे मुद्दे प्रकर्षाने उपस्थित करू शकतात.
ब्राझीलमधील ब्रिक्स परिषद 6 जुलै ते 8 जुलै अशी तीन दिवस होणार आहे. ब्राझीलची राजधानी रिओ डी जानेरो येथे याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदी विविध देशांच्या शिष्टमंडळाशी स्वतंत्र बैठका करतील. ब्रिक्स परिषदेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका असे सहा देश आहेत. त्यांच्यासह आणखी पाच देश या संघटनेचे अतिथी देश आहेत. ही प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांसंबंधीची संघटना आहे.
ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक प्रशासन, शांतता-सुरक्षा, बहुविधत्व बळकट करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उत्तरदायी पद्धतीने उपयोग, पर्यावरण संरक्षण, जागतिक आरोग्य आणि आर्थिक तसेच औद्योगिक मुद्दे आणि त्यांच्यासंबंधी भारताची भूमिका मांडणार आहेत. तसेच पहलगाम हल्ला आणि त्याला अनुषंगून दहशतवादाचा मुद्दा ते प्रकर्षाने मांडतील, अशी माहिती देण्यात आली.
अनेक द्विपक्षीय बैठका
‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचे सदस्य असणाऱ्या अनेक देशांच्या प्रमुखांची स्वतंत्ररित्या चर्चा करणार आहेत. या परिषदेला ते ब्राझीलचे नेते लुला डिसिल्वा यांच्या आमंत्रणावरून जात आहेत. दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय संबंध, गुंतवणूक आणि व्यापारवृद्धीसंबंधी चर्चा होणार आहे.