आरजे महवशसोबत डेटिंगच्या चर्चांवर अखेर युजवेंद्रकडून शिक्कामोर्तब? म्हणाला 'इंडिया जान चुका है..'
Tv9 Marathi July 06, 2025 03:45 PM

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या डेटिंगच्या चर्चा सध्या जोरदार आहेत. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलंय. इतकंच नव्हे तर आरजे महवश तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत युजवेंद्रसाठी पोस्ट लिहिताना दिसते. या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय, हे जाणून घेण्याच उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. त्यावर आता युजवेंद्रने सूचक प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच त्याने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याच्यासोबत गौतम गंभीर, ऋषभ पंत, अभिषेक शर्मासुद्धा होते. या एपिसोडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी युजवेंद्रला डेटिंग आणि गर्लफ्रेंडवरून चिडवलं. त्यावर उत्तर देताना चहलने मोठी हिंट दिली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू हे त्यांच्या शायरीसाठी ओळखले जातात. शोमध्ये आलेल्या पाहुण्यावर ते हमखास शायरी किंवा कविता करतात. अशातच त्यांनी युजवेंद्रसाठीही शायरी म्हटली होती. ते म्हणाले, “छोटा तीर घाव करे गंभीर. बहुत जबरदस्त चीज है ये. धोनी को गेंद कर देगा. 4 विकेट निकाल देगा. जहां सब भाग खड़े होते हैं, वहां चहल खड़े रहते हैं. सवाल पैदा नहीं होता कि टीम बदल दे. चलो गर्लफ्रेंड एक आध बदल देता है.” हे ऐकून कपिल त्यांना म्हणतो, “तुमच्या वेळी इन्स्टाग्राम नव्हतं, नाहीतर तुमचीही पोलखोल झाली असती.” त्यानंतर युजवेंद्र चहल त्यावर उत्तर देतो की, “भारताला आधीच समजलंय. चार महिन्यांपूर्वीच.”

View this post on Instagram

A post shared by Mahvash (@rj.mahvash)

कोरिओग्राफर आणि डान्सर धनश्री वर्माला घटस्फोट दिल्यानंतर युजवेंद्रचं नाव आरजे महवशसोबत जोडलं गेलं. यावरून महवशला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. युजवेंद्रनेच तिचं करिअर बनवलं, अशी टीका काही नेटकऱ्यांनी केली होती. त्यावर आता आरजे महवशनेही सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘मी 2019 पासून या इंडस्ट्रीत काम करतेय. चला मी तुम्हाला याआधीचं माझं करिअर दाखवते’, असं म्हणत तिने एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ती मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत दिसली.

20 मार्च रोजी क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा अधिकृतरित्या विभक्त झाले. वांद्रे कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली होती. त्यावेळी युजवेंद्र आणि धनश्री दोघं कोर्टात उपस्थित होते. धनश्री आणि युजवेंद्र हे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाला त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.