भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना पाचव्या दिवशी निर्णायक वळणावर आला आहे. भारताचा विजय आता फक्त 7 विकेट दूर आहे. इंग्लंडने भारताने दिलेल्या 608 धावांचा पाठलाग करताना 3 गडी गमवून 77 धावा केल्या आहेत. अजूनही 536 धावांनी इंग्लंड पिछाडीवर आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी भारताचा विजय किंवा सामना ड्रॉ होईल असंच चित्र आहे. पण टीम इंडिया विजयासाठी प्रयत्न करेल यात काही शंका नाही. पण पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा आता धूसर झाल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे अजूनही सामना सुरु झालेला नाही. त्यामुळे सामना सुरु झाला तर किती षटकांत खेळ होईल अशी शंका क्रीडाप्रेमींच्या मनात आहे. पावसामुळे पाचव्या दिवशीचा खेळ उशिराने सुरु होईल. इंग्लंडच्या हवामान खात्यानुसार, दुपारी 12.40 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.15) पावसाची शक्यता आहे. त्यामुळे एक सत्र पूर्णपणे पाण्यात जाणार आहे.
त्यामुळे संध्याकाळी साडे पाचनंतर भारताच्या वाटेला दोन सत्र येतील. अशा परिस्थितीत टीम इंडियाला 80 षटकं टाकता येतील. पहिले सत्र 12.40 ते 14.30, दुसरे सत्र 15.10 ते 17.10, तिसरे सत्र 17.30 ते 19.00 असं असेल. त्यात पावसामुळे गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यामुळे टीम इंडियाकडे सामना जिंकण्याची संधी आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पहिला कसोटी सामना गमावला आहे. त्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकला तर मालिकेत 1-1 ने बरोबरी साधता येईल. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर भारताच्या आशा टीकून असतील.
भारताने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 587 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात 407 धावांची खेळी केली. यामुळे भारताकडे पहिल्या डावात 180 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावातही भारताने जबरदस्त कामगिरी केली. 6 विकेट गमवून 427 धावा केल्या आणि आघाडीसह 607 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान आहे. षटकं कमी झाल्याने हे आव्हान इंग्लंडला गाठणं खूपच कठीण आहे. पण सामना ड्रॉ करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.