Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास
esakal July 07, 2025 09:45 AM

भारत आणि इंग्लंड संघात बर्मिंगहॅमला कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाचव्या दिवशी ३३६ धावांनी विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने हा विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

भारताने इतिहासात पहिल्यांदाच बर्मिंगहॅमला कसोटीत विजय मिळवला आहे. याशिवाय धावांच्या तुलनेतील भारताचा हा परदेशातील सर्वात मोठा कसोटीतील विजय ठरला आहे. भारताने ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

९ वर्षांपूर्वी २०१६ साली भारताने अँटिग्वाला वेस्ट इंडिजविरुद्ध ३१८ धावांनी विजय मिळवला होता. याशिवाय हा सामना भारताचा कर्णधार शुभमन गिलसाठीही विक्रमी ठरला आहे.

शुभमन गिलने मोडला गावसकरांचा विक्रम

या सामन्यात विजय मिळवल्याने गिल सर्वात कमी वयात परदेशात कसोटी सामना जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. रविवारी भारताने जेव्हा हा सामना जिंकला, तेव्हा गिलचे वय २५ वर्षे २९७ दिवस होते.

यापूर्वी हा विक्रम सुनील गावसकरांच्या नावावर होता. गावसकरांनी ४९ वर्षांपूर्वी १९७६ साली २६ वर्षे १९८ दिवस वय असताना कर्णधार म्हणून न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंडला झालेल्या कसोटीत विजय मिळवला होता. हा त्यांचा परदेशातील कर्णधार म्हणून पहिला विजय होता.

त्यापाठोपाठ विराट कोहली असून त्याने २६ वर्षे २८८ दिवस वय असताना भारताचा कर्णधार म्हणून २०१५ साली कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना जिंकला होता. हा विराटचा कर्णधार म्हणून परदेशात मिळवलेला पहिला विजय होता.

धावांच्या तुलनेतील भारताचे परदेशातील सर्वात मोठे कसोटी विजय
  • ३३६ धावा - विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, २०२५

  • ३१८ धावा - विरुद्ध वेस्ट इंडिज, अँटिग्वा, २०१९

  • ३०४ धावा - विरुद्ध श्रीलंका, गॉल, २०१७

  • २९५ धावा -विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ, २०२४

  • २७९ धावा - विरुद्ध इंग्लंड, लीड्स, १९८६

परदेशात सर्वात कमी वयात कसोटी सामना जिंकणारे भारतीय कर्णधार
  • २५ वर्षे २९७ दिवस - शुभमन गिल (वि. इंग्लंड, बर्मिंगहॅम, २०२५)

  • २६ वर्षे १९८ दिवस - सुनील गावसकर (वि. न्यूझीलंड, ऑकलंड, १९७६)

  • २६ वर्ष २८८ दिवस - विराट कोहली (वि. श्रीलंका, कोलंबो, २०१५)

  • २६ वर्षे २९६ दिवस - विराट कोहली (वि. श्रीलंका, कोलंबो, २०१५)

  • २७ वर्षे ४१ दिवस - मन्सूर अली खान पतौडी (वि. न्यूझीलंड, ड्युनेडिन, १९६८)

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका भारताचा विजय

बर्मिंगहॅमला झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव ६८.१ षटकात २७१ धावांवर संपुष्टात आला.

त्याआधी भारताने पहिल्या डावात सर्वबाद ५८७ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने सर्वबाद ४०७ धावा केल्या, त्यामुळे भारताला १८० धावांची आघाडी मिळाली होती.

भारताने दुसरा डाव ६ बाद ४२७ धावांवर घोषित करत पहिल्या डावातील आघाडीसह इंग्लंडसमोर ६०८ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.