Operation Mahadev : मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यातल्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा, कोणालाही न कळू देता राबवलं ऑपरेशन महादेव
Tv9 Marathi July 29, 2025 06:45 AM

एप्रिल 2022 मध्ये जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला करणारे दहशतवादी मात्र सैन्याच्या हातातून निसटले होते. दरम्यान, आता याच हल्ल्यामध्ये सहभाग असलेल्या दहशतवाद्यांसदर्भात  मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यासाठी सैन्याने ऑपरेशन महादेव राबवले आहे. या ऑपरेशनमध्ये एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

सैन्याने राबवलं ऑपरेशन महादेव

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेतला जात होता. एप्रिल महिन्यापासून भारतीय सैन्य जम्मू काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचा शोध घेत होते. शेवटी आता भारताच्या शूर सैनिकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुसा सुलेमानी हा दहशतवादी पहलगामच्या हल्ल्यात सहभागी होता. त्यालाही ठार करण्यात आले आहे.

राजनाथ सिंह यांनी संसदेत काय सांगितले?

संसदेत आज (28 जुलै) ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा चालू आहे. ऑपरेशन सिंदूर कसे राबवण्यात आले? यात भारताचे किती नुकसान झाले? तसेच पाकिस्तानने केलेले हल्ले कसे परतवून लावण्यात आले? याबाबतची सर्व माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. यावेळी बोलताना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे कोणतेही नुकसान झालेले नाही. भारतीय हवाई दलाच्या वेगवेगळ्या तळांना पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक उपकरणं यांच्या मदतीने हे सर्व हल्ले परतवून लावण्यात आले, असे राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले.

पहलगामच्या हल्ल्यात काय झालं होतं?

जम्मू काश्मीरमधील पहलगाम हे प्रसिद्ध असे पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी हजारो लोक या स्थळाला भेट देतात. मात्र 2025 सालाच्या एप्रिल महिन्यात काही पर्यटक तिथे गेलेले असताना काही दहशतवाद्यांनी थेट हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना थेट गोळ्या घातल्या. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने कडक पवित्रा घेत ऑपरेशन सिंदूर राबवले. यात पाकिस्तानमध्ये असलेल्या 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंटस्नान घालण्यात आले. नंतर पाकिस्ताननेही भारतावर हवाई हल्ले केले होते. पण भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.