‘अंधत्वमुक्त महाराष्ट्र’च्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
आतापर्यंत १, ८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : अंधत्वमुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारमार्फत याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन, वनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला असून, आतापर्यंत १९ जिल्ह्यांच्या एक हजार ८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष असल्यास त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून शासनाने नेत्रतपासणी आणि चष्मे बनविणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी असलेल्या एसीलर लक्सोटिकासोबत भागीदारी करार केला.
त्यानुसार २५ लाख शालेय विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करून विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत तपासणी झालेल्या आणि चष्म्याची आवश्यकता असलेल्या ४२ हजार ७६२ विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेच्या चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून शहरांबरोबरच दुर्गम, ग्रामीण आणि आदिवासी शाळांतील विद्यार्थ्यांचीदेखील नेत्रतपासणी करण्यात येत आहे. ‘दृष्टी यज्ञ - युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्राम’ ही अशी योजना आहे. यामधून धूसर दृष्टीमुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण बंद पडू नये याची दक्षता घेतली जाते. या माध्यमातून राज्यातील हजारो मुलांचे जीवन बदलत आहे.
हा केवळ नेत्र आरोग्याचा कार्यक्रम नाही तर ती महाराष्ट्राच्या भविष्याची गुंतवणूक आहे. स्वच्छ दृष्टीची हमी देऊन आपण चांगल्या शिक्षणाचे, उच्च ध्येयांचे आणि उज्ज्वल भवितव्याचे दरवाजे उघडतो आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.
मोहिमेचे उद्दिष्ट
महाराष्ट्रातील २५ लाख शालेय विद्यार्थ्यांची सखोल नेत्रतपासणी करून दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. यातील पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, सातारा, नाशिक, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सांगली, बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, सोलापूर, अकोला, धुळे, जालना, बुलढाणा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश आहे.