अजित पवार: शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चांगलेच अडचणीत सापडले होते. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांची कृषिमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. आता यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मिश्कील वक्तव्य करत दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती का केली? याबाबत भाष्य केले आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या परिसंवाद आणि वार्षिक अधिवेशनातून ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाला उभं राहताच सूत्रसंचालकांची खास शैलीत फिरकी घेतली. राजकारण्यांसारखा जॅकेट घातलाय अन् चुकांवर चुका करताय. राजकारणी तर चुकतात अन् तुम्ही पण चुकांवर चुका करताय, असे त्यांनी म्हटले.
अजित पवार पुढे म्हणाले की, द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशन शेतापासून आता थेट हॉटेल टीप टॉपपर्यंत येऊन पोहचले आहे. जसं जसं संघ विस्तारत चालला आहे, तशा अपेक्षा ही वाढत चालल्या आहेत. कृषी मंत्र्यांचं आत्तापर्यंत सारखं काय न काय तर निघतंय. शेवटी ठरवलं, आता असा कृषीमंत्री शोधू त्याचं काही बाहेर निघायला नको. म्हणून दत्तात्रय भरणेंना शोधलं, असे त्यांनी म्हटले. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
निवेदकाने कैलासवासी भोसले म्हटल्यामुळं आता मला कैलास म्हणूच वाटेना. म्हणून मी किशोर म्हटलं. मला सहसा दिल्लीत जावं वाटत नाही, खासदार झालो तेव्हा ही फक्त 6 महिने थांबलो आणि लगेच राज्यात परतलो. आता ही मला दिल्लीत फार थांबू वाटत नाही, काम उरकलं की लगेच आपल्या महाराष्ट्रात येतो. लाडक्या बहिणींबद्दल बऱ्याच बातम्या सुरु आहेत. मी महिला बाल कल्याणच्या मंत्र्यांशी बोलणार आहे. निधीबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ नको ते पण घेतायेत, याची छाननी पुन्हा एकदा करावी लागेल. मी मुंबईत गेलो की याबाबत बैठक घेणार आहे. लाडकी बहीण योजना आणली म्हणून द्राक्ष बागायतदारांना मजूर मिळत नाहीत. असं तुम्ही म्हणताय. मला हे कळत नाही, तुम्हाला मजूर मिळावे, म्हणून मी महिलांना पैसे द्यायचे नाही. हे काय आपल्याला पटत नाही, असे मिश्कील वक्तव्य देखील अजित पवारांनी केले आहे.
या कार्यक्रमात दत्तात्रय भरणे म्हणाले की, माझ्या जन्माच्या आधीपासूनच माझे कुटुंब द्राक्ष बागाईतदार आहे. त्यामुळं मी आधी द्राक्ष बागाईतदार आणि मग कृषीमंत्री आहे. त्यामुळं तुमच्या समस्या या माझ्या समस्या आहेत. माझ्या आजोबांपासून कुटुंबातील सगळेचं या संघाचे सदस्य आहेत. त्यामुळं मला आपल्या समस्यांची जाण आहे. कृषी मंत्री म्हणून या समस्या सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. सरकार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू, असा शब्द देतो, असे त्यांनी यावेळी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा