शारदीय नवरात्र
esakal September 11, 2025 08:45 PM

संतांचे संगती (नवरात्र विशेष) --------लोगो
(४ सप्टेंबर टुडे ४)

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
श्रीगणेशोत्सव साजरा झाल्यानंतर आपल्याला वेध लागतात ते नवरात्रीचे. श्रीगणेशोत्सवाचे दिवस दीडपासून एकवीसपर्यंत वेगवेगळे असतात; पण नवरात्र हे नऊ दिवसच असते. या काळामधील प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे वेगळेपण आहे.
- rat१०p८.jpg-
25N90579
- धनंजय चितळे
--------
शारदीय नवरात्र
नवरात्र या शब्दातील रात्र म्हणजे अज्ञान, नवरात्री देवीजवळ लावलेला अखंड दीप म्हणजे ज्ञान. अज्ञानावर ज्ञानाने केलेली मात म्हणजे नवरात्र. पूर्वी प्रत्येक ऋतूंमध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात असे. आता आपण शरद ऋतूत नवरात्र करतो म्हणून याला शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्रीच्या आरतीमध्ये नऊ दिवसांचे वर्णन वाचायला मिळते. नवरात्रीनिमित्त आपण श्री जगदंबेविषयीच्या काही रचना समजून घेऊया. मराठी घरांमध्ये सुखकर्ता दुःखहर्ता, लवथवती विक्राळा, घालीन लोटांगणासारख्या काही आरत्या म्हटल्या जातातच. दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ही त्यापैकीच एक आरती आहे. या आरतीत रचनाकार नरहर किंवा नरहरी श्रीजगदंबेची स्तुती करत आहे. ती आदिमाया कळण्यासाठी अवघड आहे. तिला प्राप्त करून घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून ती दुर्गे दुर्घट भारी आहे. ती अनाथांची तारणहार, आई आहे. (अम्बे म्हणजे आई, जगदंबा म्हणजे जगाची आई.) एखाद्या देवतेला दरवर्षी किंवा दरमहा नियमितपणे जाणे म्हणजे तिची वारी करणे. श्रीकुलदेवतेची, देवीची वारी केल्याचे फळ सांगताना नरहरकवी सांगतात, ही भक्तीची वारी भक्तांच्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यावर म्हणजे वारीवर वार करते आणि भक्ताचे त्यातून निवारण करणे. अर्थात, वारी वारी जन्म मरणाते वारी! पुढील कडव्यात रचनाकार म्हणतात, हे देवी, त्रिभुवन भुवनात शोधले तर तुझ्यासारखे कुणीच नाही. चार वेद तुझी स्तुती करताना दमले आणि सहा शास्त्रे तुझे स्वरूप कसे आहे याबद्दल परस्परांत विवाद करत वाहून गेली म्हणजेच चारी श्रमले; परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडिले प्रवाही!
आरतीच्या अखेरच्या चरणात कवी म्हणतो, हे माते तू प्रसन्नवदने प्रसन्न होऊन तुझ्या दासाला क्लेशांपासून सोडव आणि भवपाशातून मोकळे कर. माते तुझ्याशिवाय माझी ही आशा कोण पूर्ण करणार?
आपल्या सर्व आरत्या अगदी भावपूर्ण आहेत, त्यांचा अर्थ समजून घेऊन त्या म्हटल्या तर त्याचा आनंद मिळतोच शिवाय देवांशी संवाद केल्याचे समाधानही मिळते.

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.