Pakistan Afghanistan Clash :z सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले केले. विशेष म्हणजे हा संघर्ष जास्तच पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना दोन्ही देशांत युद्धविरामासाठी करार झाला. हा संघर्ष चालू असताना पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताची बदनामी करणे चालू केले होते. पाकिस्तानवर अफगाणिस्तान हल्ले करत आहे. या हल्ल्यांच्या मागे भारताचा हात आहे, असा दावा पाकिस्तानकडून केला जात होता. असे असतानाच आता खुद्द अफगाणिस्ताननेच पाकिस्तानला उघडे पाडले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटला आहे.
पाकिस्तानने भारताविरोधात केलेले सर्व आरोप अफगाणिस्तानने फेटाळले आहेत. पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी भारताविरोधात गरळ ओकली होती. अफगाणिस्तानला पुढे करून भारत पाकिस्तानविरोधात प्रॉक्झी युद्ध लढत आहे, असे आसीफ म्हणाले होते. आता पाकिस्तानच्या याच दाव्यावर अफगाणिस्तानचे संरक्षमंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहीद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानकडून भारतावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. आम्ही आमच्या देशातील भूमी अन्य देशांच्या विरोधात कधीच वापरणार नाही. एक स्वतंत्र राष्ट्र या नात्यानेच आमचे भारतासोबत संबंध आहेत. आमचे पाकिस्तानसोबतचही चांगले संबंध असले पाहिजेत अशी आमची नीति आहे. आमचा हेतू हा तणाव वाढवणे नसून नात्यांमध्ये वृद्धी करणे हा आहे. पाकिस्तानचे आरोप निराधार, तर्कहीन आणि अस्वीकारार्ह आहेत, असे मौलवी मोहम्मद याकूब मुजाहीद यांनी स्पष्ट केले आहे.
सोबतच एखाद्या देशाने आमच्या भूमीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही साहसाने प्रतिकार करू, असा थेट इसाराही पाकिस्तानला देऊन टाकला. कोणत्याही देशाविरोधात कारवाई करण्यासाठी अफगाणिस्तान सशस्त्र समूहांचे समर्थन करणार नाही. तशी आमची नीति नाही. आम्हाला एक शेजारी म्हणूनपाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत, असेही मौलवी मोहम्मद याकूब मुजाहीद यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आता पाकिस्तानचे आरोप निराधार असल्याचे अफगाणिस्तानने सांगितल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडावर आपटला आहे, असे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानच्या स्पष्टीकरणानंतर आता पाकिस्तान नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.