IMD Weather Update : पुन्हा अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट, हाय अलर्ट जारी, महाराष्ट्राबाबत सर्वात मोठी अपडेट
Tv9 Marathi November 16, 2025 08:45 AM

या वर्षी देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, पावसानं चांगलंच झोडपून काढलं, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. महाराष्ट्राला तर पावसाचा मोठा तडाखा बसला, अनेकांचे संसार नद्यांना आलेल्या पुरामुळे पाण्यात वाहून गेले. खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. दरम्यान आता पावसाचं संकट टळलं आहे, असं वाटत असतानाच पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिण श्रीलंका आणि पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा एकदा एअर सायक्लोनिक सर्कुलेशन (Cyclonic Circulation) तयार झालं आहे. याचा परिणाम म्हणजे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा आता हळुहळु पश्चिम उत्तर दिशेकडे सरकत आहे, त्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पवासाचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) कडून वर्तवण्यात आला आहे.

काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशात सध्या पावसाला अनुकूल असं वातावरण निर्माण झालं असून, याचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू आणि केरळच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे, तर काही भागांमध्ये अतिमुसळधारपावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पुढील दोन ते तीन दिवस आंध्रप्रदेश, लक्षद्वीप आणि आंदमार निकोबार बेटावर देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या काळात तामिळनाडूसोबत केरळ आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळासह पावसाची शक्यता आहे. या काळात हवेचा वेग प्रतितास 50 किमी इतका राहण्याचा अंदाज असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे, याबाबत ‘सीएनबीसी आवाज’ने वृत्त दिलं आहे. 

महाराष्ट्रात काय स्थिती?

दरम्यान दुसरीकडे मात्र दक्षिण भारत वगळता इतर राज्यांमध्ये थंडीचा कडका वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची लाट येणार आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात कडक्याची थंडी पडू शकते असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोणताही पावसाचा इशारा नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.