आळंदी, ता. २१ : हरिपाठ पाठांतर व अर्थ विवेचन तसेच ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमामुळे माझ्या जीवनावर झालेला परिणाम या विषयांवर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन आळंदीमध्ये शनिवारी व रविवारी (ता. २५) श्री ज्ञानेश्वर विद्यालयात होणार आहे. या स्पर्धेसाठी ६२ शाळांमधून ३८७ विद्यार्थी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. २४) सकाळी दहा वाजता सागर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त मारुती जगताप, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. रोहिणी पवार, विलास बालवडकर व ओळख श्री ज्ञानेश्वरीची परिवारातील सर्व घटक यांच्या उपस्थितीत होईल. रविवारी (ता. २५) दुपारी अडीच वाजता पारितोषिक वितरण, स्पर्धा सांगता समारंभ व ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ पुस्तकाची द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार बाबाजी काळे, पोलिस उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ परिवारातील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या बाबत माहिती देताना ज्ञानेश्वर विद्यालयाचे सचिव अजित वडगावकर आणि संत ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी सांगितले की, ज्ञानेश्वर विद्यालयात पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हरिपाठ पाठांतर, सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हरिपाठ अर्थ विवेचन व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या संस्कारक्षम उपक्रमाची पाच वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये होणारे सकारात्मक बदल पाहून राज्यातील १५०हून अधिक शाळांनी हा उपक्रम स्वीकारला आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व आळंदी शहर पत्रकार संघ यांचा मिळून एक परिवार तयार झाला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण व संस्कार देण्याचे कार्य राज्यभरातील दीडशेहून अधिक शाळांमध्ये करीत आहेत. ज्या शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. अशा शाळांत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, वैचारिक, सांस्कृतिक जडणघडणी बरोबरच एक आदर्श व्यक्तिमत्त्व घडण्याच्या दृष्टिकोनातून मोलाची ठरणार आहे. पर जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवासाची सोय केलेली आहे. ओळख ज्ञानेश्वरीचे अध्यापक उमेश महाराज बागडे यांनीही मार्गदर्शन केले.