लोकशाही जपण्याचे आवाहन
आपल्या देशात निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव न राहता, एकमेकांच्या बद्दल आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेसाठीची धडपड बनली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी खोटे आरोप पसरवायचे, भीतीचे राजकारण करायचे, हे सर्व चालू असताना एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, ही देशसेवा आहे की केवळ सत्तेचा स्वार्थ? लोकशाही ही एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठी नाही, तर विचार मांडण्यासाठी आहे. विरोधक म्हणजे शत्रू नव्हे, तर वेगळा विचार मांडणारा लोकप्रतिनिधी असतो. हे पत्र कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही, तर लोकशाहीच्या बाजूने आहे. कारण देश सर्वांच्या वर आहे, आणि लोकशाही ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
- साधना सवाने, पिंपरी