Riteish Deshmukh Mourns Ajit Pawars Demise: महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी घटना आज सकाळी बारामतीत घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. विमान लँडिंगवेळी अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी बारामतीत जात असताना त्यांचा दुर्देवी अपघात झाला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकाकूल झाला आहे. नेतेमंडळींसह सिनेसृष्टीतील कलाकारांनाही अश्रू अनावर झाले आहे. अभिनेता रितेश देशमुख याने समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करून श्रध्दांजली वाहिली आहे. तसेच दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अजित पवारांसोबतचे फोटो शेअर केले आहे.
रितेश देशमुखने विलासराव देशमुख आणि अजित पवार यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तसेच कॅप्शनद्वारे श्रध्दांजली वाहिली. "एका दुर्देवी अपघातात अजित पवार यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली. ही बातमी ऐकून खूप मोठा धक्का बसला, खूप दु:ख झाले. महाराष्ट्रातील सर्वात गतिमान नेत्यांपैकी ते एक होते. त्यांच्या कामगिरीत कोणतीही कमतरता नव्हती. ते सतत त्यांच्या सभोवतालच्या लोकांना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करायचे. त्यांची बुद्धिमत्ता अतुलनीय होती. राज्यभरातून त्यांच्यावर कायम प्रेमाचा वर्षाव केला जात होता. त्यांच्या अकाली निधनामुळे एक मोठे नुकसान आणि कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. पवार कुटुंब, त्यांच्या प्रियजनांना आणि लाखो समर्थकांना माझ्या मनापासून संवेदना", अशी दु:खद भावना रितेश देशमुखने पोस्टद्वारे व्यक्त केली.
Deeply shocked and terribly heartbroken to learn that we have lost Ajit Dada in a tragic accident. One of Maharashtra’s most dynamic leaders, he had zero tolerance for non-performance and constantly pushed and inspired those around him to excel. He never minced his words, his wit… pic.twitter.com/nGQ3M1xf0Z
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 28, 2026
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. ते आपल्या कार्यकाळात सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहिले. त्यांनी बी. कॉम या पदवीचं शिक्षण घेतलं. नंतर शेती व्यवसाय सांभाळत अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत वित्त, नियोजन, ऊर्जा जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती प्रभावीपणे हाताळली. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वर्तुळातून तसेच सिनेविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.