IND vs NZ 5th T20I: इशान किशन खेळणार, संजू सॅमसनचा पत्ता कट होणार? टीम इंडियाच्या बॅटींग कोचने दिले महत्त्वाचे अपडेट्स
esakal January 31, 2026 04:45 AM

Will Ishan Kishan play 5th T20I vs New Zealand? भारत-न्यूझीलंड यांच्यातला ट्वेंटी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. संजू सॅमसन ( Sanju Samson) त्याच्या घरच्या मैदानावर पहिलीच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लढत खेळणार आहे आणि त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त दडपण असणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची होती, परंतु संजू चारही सामन्यात अपयशी ठरला. त्यामुळे उद्याच्या लढतीत प्लेइंग इलेव्हनमधील त्याच्या स्थानाबाबत अजूनही शंका आहे. चौथ्या सामन्याला मुकलेल्या इशान किशन ( Ishan Kishan) पाचव्या लढतीत पुनरागमन करेल, असे संकेत बॅटींग कोच सितांशु कोटक यांनी दिले आहेत. त्याचवेळी त्यांनी संजूबद्दलही महत्त्वाचं विधान केलं आहे.

इशान किशनला चौथ्या सामन्यात दुखापतीमुळे मुकावे लागले होते. पण, तो ड्रिंक्स ब्रेकदरम्यान खेळाडूंसाठी पाणी आणताना दिसला. त्यामुळे त्याच्या दुखापतीवरुन बरेच प्रश्न विचारले गेले. पाचव्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे फलंदाज प्रशिक्षक सितांशु कोटक हे म्हणाले, “इशान किशन सरावासाठी मैदानात उतरला आहे. तो खेळण्याची शक्यता जास्त आहे, मात्र अंतिम निर्णय फिजिओ घेतील.”

बाजूला व्हा... नो फोटो प्लीज! Sanju Samson साठी सूर्यकुमार बनला अंगरक्षक; केरळमध्ये पोहोचताच असा का वागला? Video Viral

कोटक यांनी अभिषेक शर्माचे कौतुक केले. त्याने सूर्यकुमार यादव व गौतम गंभीर यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या आहेत, असेही कोटक यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ही मालिका खूप महत्त्वाची होती. वर्ल्ड कप स्पर्धेत तुम्ही फॉर्म मिळवून जाण्यासाठी ही मालिका महत्त्वाची होती. जेव्हा तुम्ही ट्वेंटी-२०त अनेक सामने खेळता, तेव्हा तो आत्मविश्वासही येतो. खेळाडूंना अधिक संधी देणे गरजेचे आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजू अपयशी ठरलेला दिसतोय. त्याला मागील चार सामन्यांत १०, ६, ०, २४ अशाच धावा करता आल्या आहेत. संजू सॅमसनचा फॉर्मवर विचारलेल्या प्रश्नावर कोटक म्हणाले, तो सीनियर खेळाडू आहे. त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या धावा सध्या त्याच्याकडून होताना दिसत नाही. त्याला त्याची स्पेस, मोकळीस देण्याचं आमचं काम आहे. त्यात किती क्षमता आहे, हे आपल्या सर्वांना माहित्येय.

जसप्रीत बुमराहला विश्रांती...

भारताने ही मालिका ३-१ अशी आधीच जिंकली आहे आणि त्यामुळे पाचव्या सामन्यात काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांना उद्याच्या लढतीत विश्रांती दिल्यास आश्चर्य वाटायला नको. तिसऱ्या सामन्यातही त्यांना विश्रांती दिली गेली होती. संजू सॅमसनला आणखी एक संधी मिळेल हे निश्चित आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.