Jaykumar Gore : जिल्हा परिषद (Jilha Parishad) आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अनेक ठिकाणी नेते कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सांगोल्यात त्यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. आज भाषण करताना मला इतक्या चिठ्ठ्या येऊ लागल्या आहेत, पण मी कॉलेजला असताना मला कोणी सुद्धा चिठ्ठी दिली नव्हती अशी टोलेबाजी जयकुमार गोर यांनी केली.
आज सांगोल्यात जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर देखील सडकून टीका केली. आज सांगोल्यातील नाझरे येथे भाजप जिल्हा परिषद उमेदवार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांच्या प्रचारासाठी जयकुमार गोरे आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची सभा झाली. यावेळी बोलताना गोरे यांनी सरकारच्या योजना सांगत शेतकऱ्यांना मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांचे पैसे येतात, लाडक्या बहिणींना महिन्याला पैसे येतात, वीज बील माफ केले आहे अशा अनेक योजना केल्याचे गोरे यांनी सांगितले. मात्र हे करताना तुम्ही काय तुमच्या खिशातले पैसे देता काय? असे विरोधक विचारतात. आम्ही आमच्या खिशातले पैसे देत नाही हे खरे आहे मात्र, तुम्ही सत्तेत असताना तुम्ही का दिले नाहीत, त्यावेळी तुमचे खिसे फाटले होते का? असा टोला देखील गोरे यांनी विरोधकांना लगावला.
सांगोल्यातील नाझरे सभेत बोलताना करण्यात आलेल्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. तुम्ही म्हणाल राजा उदार झाला. प्रत्येक मागणी होय कसं म्हणतो असे वाटेल पण माझ्या ग्राम विकास खात्याचे बजेट 50 हजार कोटीच आहे आणि मी पालकमंत्री असल्याने ते बजेट 1000 कोटी रुपये आहे. त्यातील थोडे जरी झाडले तरी या गोरगरिबांचे प्रश्न आणि मागण्या पूर्ण होतील अशी टिप्पणीही गोरे यांनी केली. उद्या तुमच्याकडे जे लोक मते मागायला येतील त्यांचे बूड कुठे स्थिर नाही असा टोलाही गोरे यांनी विरोधकांना लगावला.