अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणावरून केलेल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ट्विटमध्ये मिटकरी यांनी अपघातासंदर्भात अनेक गंभीर व संशयास्पद मुद्दे उपस्थित करत सखोल आणि पारदर्शक तपासाची मागणी केली आहे.
मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये सुरुवातीला सहा जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यानंतर केवळ पाच मृतदेहच सापडल्याची माहिती समोर आली. “जर सहा जणांचा मृत्यू झाला असेल, तर सहावी व्यक्ती कुठे आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मृतांच्या संख्येबाबत झालेली ही विसंगती संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Maharashtra Fisheries : पर्ससीन, एलईडी मासेमारीची एसआयटीमार्फत चौकशी करा; पारंपरिक मच्छिमार संरक्षण समितीची मागणी!यासोबतच टेकऑफपूर्वी पायलट बदलण्यात आल्याचा मुद्दाही मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. “टेकऑफच्या आधी एवढे पायलट का बदलण्यात आले?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निर्णयामागील कारणांवर संशय व्यक्त केला आहे. विमान वाहतुकीसारख्या अत्यंत संवेदनशील विषयात अशा बदलांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.
मिटकरी यांनी टेकऑफच्या वेळी होणाऱ्या डिजिटल नोंदणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “टेकऑफच्या वेळी डिजिटल रेकॉर्ड तयार होते. मग त्या नोंदींमध्ये इतकी मोठी विसंगती कशी निर्माण झाली?” असा सवाल त्यांनी केला आहे. या डिजिटल डेटामधील तफावत अनेक प्रश्नांना जन्म देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर विमानातील महत्त्वाची कागदपत्रे जळाली नाहीत, हा मुद्दाही संशयास्पद असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. “अपघात इतका गंभीर होता, तर कागदपत्रे सुरक्षित कशी राहिली?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आपण दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे थेट मागणी करणार असल्याचे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अपघातप्रकरणावर पुन्हा एकदा संशयाचे सावट पसरले असून, आता तपास यंत्रणांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.