गजबजलेली गावं यात्रा संपताच ओस
esakal February 03, 2026 08:45 AM

कोळवण, ता. २ ः सध्या तालुक्यातील विविध गावांतील ग्रामदेवतांच्या वार्षिक यात्रा सुरू आहेत. त्यानिमित्ताने गाव सोडून पुणे, मुंबई येथे कामधंदा, नोकरी व मुलांच्या शिक्षणासाठी बाहेर गेलेले तरुण, तरुणी पुन्हा यात्रा काळात गावातील घरी येतात. यात्रा काळातील त्या मोजक्याच दोन-चार दिवसात गावं गजबजलेली असतात. बंद घरात माणसांचा राबता असतो, ज्या घरात फक्त वृद्ध आई वडील असतील त्या घरातही त्यांची मुलं, सुना, नातवंडे असं गोकुळा सारखं भरलेलं घर दिसतं.
यात्रोत्सव काळात सर्व गावातील घरात माणसांचा भरणा दिसतो. पाहुणे मंडळींनी व मित्र मंडळ यांनी घर व अंगण फुललेले दिसते. जेवणावळी उठतात. सर्व ठिकाणी आनंदी आनंद दिसतो. परंतु एकदा का यात्रा उत्सव यांची सांगता झाली की मग पुन्हा गावाकडे आलेले चाकरमानी आपल्या कामावर व्यवसायावर रुजू होण्यासाठी शहराकडे निघतात. मुलांच्याही शाळा असतात यासाठी नाइलाजाने का होइना गावं सोडावी लागतात. मग पुन्हा गावखेडी ओस पडतात. काही घरांमध्ये वृद्ध आई वडील तर काही घरं कुलूपबंद होतात.
गावातील आळ्यांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक राहिले आहेत हे आजच्या घडीचे वास्तव आहे.
यात्रा काळात गजबजलेला गाव पुन्हा रिकामा दिसू लागतोय दिवसेंदिवस हे स्थलांतर वाढतच आहे.

पुण्यात स्नेहमेळावे
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे. प्रचार करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना गावातील बंद घरं व बोटांवर मोजण्याइतकेच मतदार घरी सापडतात. यावर उपाय म्हणून उमेदवार शहरातील स्थलांतरित मतदारांचे स्नेह मेळावे पुण्यातील विविध भागात घेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.