सोमेश्वरनगर, ता. ३ ः गुनवडी (ता. बारामती) येथे शेगर-धनगर समाजाच्या वतीने सोमवारी वधू-वर परिचय मेळावा साधेपणाने पार पडला. यामध्ये २४० विवाहेच्छुक तरूण-तरूणी यांनी सहभाग घेतला. दरम्यान, यानिमित्ताने मेळाव्यात दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शेगर धनगर महासंघ व शेगर-धनगर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी वधू-वर व पालक परिचय मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करून मेळाव्याचा प्रारंभ झाला. मेळाव्यात वधू व वर यांचा परिचय करून देण्यात आला. तसेच समाजातील दहावी-बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही महासंघाचे अध्यक्ष सुनील भगत, कार्याध्यक्ष भारत गावडे, अॅड. जी. बी. गावडे, प्रा. अजय गाढवे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी दशरथ राऊत, दत्तात्रेय माळशिकारे, सोपान आटोळे, किसन आटोळे, हनुमंत नाझीरकर, पोपट गावडे, निर्मला रोटे, सुहास माळशिकारे उपस्थित होते.
वधूवरांच्या परिचय पत्राचे वाचन डॉ. सरोजिनी खोमणे, प्रा. संभाजी साबळे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल धापटे यांनी केले. तर आभार प्रा. शिवलाल गावडे यांनी मानले. सुनील येडे, शिवाजी गावडे, राजेंद्र गावडे, बाळासाहेब गावडे, दत्तकृपा पतसंस्था यांनी मेळाव्यास सहकार्य केले.
शेतकरी मुलांचा गौरव
एकीकडे शेतकरी तरुणांची लग्ने होत नसल्याचे वास्तव समाजात आहे. मात्र शेगर-धनगर समाजाच्या मेळाव्यात शेतकरी तरुणांना प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घेतली जात आहे. एका महिलेने, माझ्या मुलीसाठी निर्व्यसनी असा शेतकरी वर चालेल असे जाहीरपणे मनोगतात सांगितले. तर गणेश आटोळे या तरुणाने, ‘‘मला डाळिंबातून पाच एकरात दरवर्षी पन्नास लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. फ्लॅट, गाडीसाठी ईएमआयची, लोनची गरज नाही. मला मुलगी शिकलेली नसली तरी चालेल पण शेतात मदत करणारी हवी. तिला सन्मान निश्चित मिळेल,’’ असे सांगितले आणि मेळाव्यात टाळ्यांचा कडकडाट झाला.