रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता दोघेही फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहे. या दोघांचं पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027वर लक्ष आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खरंच संधी मिळेल का? असा प्रश्न आहे. महेंद्रसिंह धोनीने या प्रश्नावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. महेंद्रसिंह धोनीच्या मते, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वर्ल्डकप खेळायला हवा. त्यांच्यासाठी वय हा काय मापदंड नाही. कामगिरी आणि फिटनेसच्या जोरावर रोहित शर्मा-विराट कोहली यांना संघात स्थान मिळू शकते. पण महेंद्रसिंह धोनीच्या वक्तव्यावर काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच काय तर त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
महेंद्रसिंह धोनी सांगितलं की, ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2027 वनडे वर्ल्डकप का खेळू नये. माझ्या मते वय हा काय मापदंड नाही. पण कामगिरी आणि फिटनेस महत्त्वाचा आहे. कारण त्यांचं वय 30 पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की ते खेळू शकत नाही. मोठ्या सामन्यात कायम अनुभव महत्त्वाचा असतो.’ धोनीचं म्हणणं विराट आणि रोहितच्या चाहत्यांना खूपच आवडलं. पण काही जणांना धोनीवर टीका करण्याची संधी मिळाली. एका चाहत्याने पोस्ट करत लिहिलं की, धोनी आज असं बोलत आहे कारण त्याने कर्णधारपद असताना दिग्गजांची चिंता केली नाही. दुसऱ्या चाहत्याने लिहिलं की, धोनीने फक्त सचिनला पाठिंबा दिला आणि त्याने सेहवाग, युवराज, हरभजन यांच्यासोबत काय केलं?
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं. आता तिसऱ्यांदा जेतेपद मिळवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या मते टीम इंडियाकडे जेतेपद मिळवण्याची सर्व क्षमता आहे. फक्त मैदानात पडणारं दव हा खूप मोठा टर्निंग प्वाइंट ठरणार आहे. त्याची चिंता त्याने या मुलाखतीत बोलून दाखवली. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा सामन्याच्या निकालाची स्थिती ठरवणार आहे.