साहित्य क्षेत्राला पालिकेत बहुमान
वसई-विरार शहराच्या महापौरपदी अजीव पाटील
प्रसाद जोशी ः सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ३ ः वसई-विरार शहर पालिकेच्या महापौर पदासाठी मंगळवारी (ता.३) मुख्य कार्यलयाच्या सभागृहात निवडणूक पार पडली. यावेळी साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अजीव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आल्याने साहित्य विश्वातून आनंद व्यक्त केला जात आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विरार शाखेचे अजीव पाटील अध्यक्ष आहे. तसेच साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य आहेत. याचसोबत यंग स्टार्स ट्रस्टचे समन्वयक आहेत. लेखक, साहित्यिक,कवी, नवोदित लिखाण करणाऱ्यांसाठी त्यांनी व्यासपीठ तयार केले आहे. व्हिवा साहित्य चावडी कट्ट्याचे समन्वयकाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील साहित्य क्षेत्राला नवी उभाररी मिळत आहे.
त्यामुळे एकीकडे राजकीय क्षेत्रात संयमी, शांत अशी प्रतिमा असलेली अजीव पाटील यांनी साहित्य, संस्कृती, खेळ क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
--------------------------------
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी अजीव पाटील यांची महापौरपदी निवड करून साहित्य क्षेत्राला पालिकेत वाव दिला आहे. या निवडीमुळे भविष्यात ग्रंथालय, लेखक, कवी, साहित्यिकांना नवे व्यासपीठ मिळणार आहे.
- प्रकाश पाटील, साहित्यिक-लेखक
----------
वसई-विरार महापालिकेला साहित्याची आवड आणि प्रेम असणारा महापौर म्हणून अजीव पाटील लाभले याचा आनंद आहे. पालिकेच्या माध्यमातून साहित्य सांस्कृतिक उपक्रमासाठी त्यांनी राखीव निधीसाठी विचार करावा जेणेकरून वसईतील साहित्य चळवळीला अधिक प्रोत्साहन मिळेल.
़-अशोक बागवे, ज्येष्ठ कवी