सदर- मुंज न होता उपाध्यांच्या घरची पूजा कशी चाले0
esakal February 05, 2026 11:45 AM

परिवर्तन---------लोगो
(२९ जानेवारी टुडे ४)

मुंज न होता उपाध्यांच्या
घरची पूजा कशी चाले?

उपाध्यांच्या देवाची पूजा करण्याचे भाग्य त्याला मिळत असले तरी घरच्या देवांची पूजा करण्याची त्याला परवानगी नव्हती. अर्थातच, त्याबाबत तो नाराज होता. घरची पूजा उपाध्यांनीच करायची, असे शास्त्र होते. त्यामुळे तेथे त्याला मज्जाव होता. घरी वैश्वदेव पूजन करायचे असे. ते याच्या आवाक्याबाहेरचे होते. कारण, याची अजून मुंज झाली नव्हती. या सर्व गोष्टींमुळे त्याला राग येई; पण कोणासमोर त्याचे तो प्रदर्शन करू शकला नाही.

- rat४p६.jpg-
P26O22005
- डॉ. शरद प्रभुदेसाई, रत्नागिरी
----
दरवर्षी श्रींच्या आजी-आजोबांचे श्राद्ध होत असे तसेच पितृपंधरवड्यात महाळ होत असे. या गोष्टी पूर्वजांच्या आठवणीसाठी करत असत, हे ‘श्री’ला माहीत होते. बाबांनी त्याला याबाबत नीट समजावून सांगितले होते. या गोष्टी यथासांग पार पडणे आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी फलदायी असते, हे त्याच्या बालमनाला पटले होते. या विधींच्यावेळी भटजी सांगत तेव्हा हा नमस्कार करायला जात असे. श्राद्ध आणि महाळ त्याला आणखी एका गोष्टीसाठी आवडे. या दोन्ही कार्यक्रमात जेवणात पक्वान्नांची चंगळ असायची. पक्वान्नावर आडवा हात मारायला मिळे. नेहमी न होणारी वडे घारगे यासारखी पक्वान्ने खायला मिळत. त्यामुळे श्री तृप्त होई. या विधीमध्ये भटजींना पितरासाठी आधी जेवायला वाढत. त्यांचे जेवण झाल्यावर इतर सर्वांना जेवायला वाढत. श्रीला कधी एकदा पक्वान्नावर हात मारतोय, असे होत असे. त्यामुळे आधी जेवायला बसणाऱ्या भटजींचा त्याला राग येत असे.
श्रीला आईने तो चौथीत असताना रामरक्षा शिकवली. त्याची रामरक्षा सहज पाठ झाली. तो आजोळी जाई, तिकडे सर्व मुले सायंकाळी परवचा म्हणत. ती विविध देवांची स्तोत्रे म्हणत. यालाही परवचा म्हणायला बसावे लागे. त्याला एकही स्तोत्र पाठ नव्हते. तो तसा हुशार एकपाठी नसला तरी ऐकून हळूहळू त्याची स्तोत्रे पाठ होऊ लागली. आईबरोबर हा दर सहा महिन्यांनी आजोळी जायचा त्या वेळी त्याचे एकतरी नवीन स्तोत्र पाठ होई. आपणही ही स्तोत्रे दररोज म्हणावीत, असे त्याला वाटत असे. श्रीच्या घरी परवचा म्हणण्याचा शिरस्ता नव्हता; पण सायंकाळी हातपाय धुवून देवाला नमस्कार करण्याची पद्धत होती. देवाला नमस्कार केल्यानंतर तो पाठ असलेली सर्व स्तोत्रे म्हणे. स्तोत्रे म्हणताना चुका होत; पण घरात कोणाचेच पाठांतर नसल्याने कोणालाच चुका कळत नसत. आजोळी गेल्यावर त्याचे मामा चुकांची दुरुस्ती करत. हळूहळू श्रीच्या अंगी देवभक्ती दृढ होत होती.
गावात श्रीच्या शेजारी उपाध्यांची घरे होती. श्रीच्या घरी दररोज उपाध्याय देवपूजेसाठी येई. दररोज वैश्वदेव म्हणजे अग्निपूजा असे. ते पूजेनंतर जेवून जात. देवपूजेच्या वेळी सोवळ्याचे पालन योग्यप्रकारे होत असे, हे सांगण्याची गरज नाहीच. शेजारचे उपाध्ये दरवर्षी चातुर्मासात मुंबईला भिक्षुकीसाठी जात. या चार महिन्यात त्यांच्या देवाची पूजा करण्याची जबाबदारी श्रीवर असे. खरेतर, त्याच्या घरी बायका असत; पण बायकांना पूजा करण्याची परवानगी नव्हती म्हणूनच हे काम श्रीवर असे. देवपूजा करण्याचे काम त्याच्यावर पडल्यामुळे श्री फार खूश असे; पण त्यांच्याकडील देव्हाऱ्यातील देवांची संख्या फार असल्याने या कामाचा त्याला कंटाळा येत असे; पण देवासाठी असलेल्या आत्मीयतेपोटी कंटाळा न आणता हे काम करण्याचा त्याचा प्रयत्न असे.
पुढे पुढे उपाध्यांना श्रीच्या घरी दररोज पूजा करणे शक्य होत नसे. मग कधी कधी घरच्या देवांची पूजा श्रीला करावी लागे. श्रीची मुंज न झाल्याने त्याच्या आई-बाबांना पूजा त्याच्याकडून करून घ्यायला आवडत नसे. कारण, खोताच्या देवाची पूजा मुंज झालेल्या ब्राह्मणानेच करायची, असा नियम होता. त्याचवेळी मुंज न झालेला श्री उपाध्याच्या घरच्या देवांची पूजा महिनोन्महिने करत असे. त्या वेळी श्रीच्या मुंजीचा प्रश्न येत नसे. हा प्रश्न त्या लहान वयातही श्रीच्या डोक्यात येई. देवपूजा करायला मिळत असे म्हणून तो त्याबाबत फार विचार करत नसे. तसेही बालमन फार चिकित्सकही असत नाही.

(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.