मामा-भाच्याचा वाद निवडणूक रिंगणात
खारेपाटात कमळ फुलणार नाही; जयंत पाटील यांचा टोला
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ : खारेपाट परिसरातील तलाव आणि तळी हजारो कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्याबरोबरच रोजगाराचेही महत्त्वाचे साधन ठरत असल्याचे सांगत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी विरोधकांवर सूचक टीका केली. या तलावांतील पाणी इतके शुद्ध आहे की येथे कधी कमळ फुलले नाही आणि भविष्यातही फुलणार नाही, असा टोला त्यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला आपला भाचा ॲड. आस्वाद पाटील, त्यांची पत्नी चित्रा पाटील यांचे नाव न घेता लगावला. खारेपाटातील जनता कमळ फुलू देणार नाही, ही अस्तित्वाची लढाई असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
शेकापची एकहाती सत्ता असलेल्या पाटील कुटुंबीयांमध्ये फूट पडल्यानंतर माजी आमदार पंडित पाटील, स्व. मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा चित्रा पाटील, सवाई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीत दक्षिण रायगडमधील भाजपची सूत्रे आस्वाद पाटील यांच्याकडे आहेत. शहापूर येथे सवाई पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली, तर आंबेपूर मतदारसंघातून चित्रा पाटील निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी चंग बांधला आहे. शेकाप-महाविकास आघाडीच्या उमेदवार पूजा भगत यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित सभेत जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
खारेपाटातूनच काम करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगत लाल बावटा अभिमानाने फडकवण्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. गौतम पाटील यांनी खारेपाट हा शेकापचा बालेकिल्ला असल्याचे नमूद केले.
फोटो - 885