पाणीटंचाईच्या संकटावर श्रमदानातून मात
विक्रमगड (बातमीदार) ः तालुक्यातील मलवाडा व वाकी येथील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. पिंजाळ नदीवर श्रमदानातून वनराई बंधारा उभारून जलसंधारणाचा आदर्श घालून दिला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते; मात्र उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. विहिरींची पातळी खालावते, जनावरांसाठी पाण्याची समस्या निर्माण होते. भाजीपाला पिकांवर त्याचा परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर मलवाडा, वाकी येथील तरुणांनी पुढाकार घेत नदीपात्रात वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. स्थानिक स्तरावर बांधलेला बंधारा परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरणार आहे.