'घूसखोर पंडत' सिनेमाच्या अडचणीत वाढ; मुख्यमंत्र्यांचा एका शब्दाला विरोध, मनोज वाजपेयींची पहिली प्रतिक्रिया
भाग्यश्री कांबळे February 06, 2026 07:43 PM

Manoj Bajpayee Reacts to ‘Ghuskhore Pandit’ Issue: नीरज पांडे निर्मित आणि मनोज वाजपेयी अभिनीत 'घूसखोर पंडत' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट मंगळवारी प्रदर्शित झाला. तेव्हापासून सिनेमाच्या नावामुळे  वादात सापडला आहे. काहींनी या चित्रपटाच्या शीर्षकावर टीका केली आहे. काहींनी या चित्रपटाचे नाव ब्राह्मण समुदायाचे अपमान करणारे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेटफ्लिक्स आणि 'घूसखोर पंडत'च्या निर्मात्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनेनंतर लखनऊमध्ये या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

या पार्श्वभूमीवर, नीरज पांडे यांनी  एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात त्यांनी या चित्रपटाच्या संबंधित सर्व प्रोमोशनल मटेरियल काढण्याचा निर्णय घेतला आहे. आता मनोज वाजपेयी यांनीही या वादावर आपले मौन सोडले आहे. त्यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर  केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जनतेच्या भावनांचा आदर करत असल्याचं म्हटलं आहे. 

या प्रकरणात मनोज वाजपेयी म्हणतात, "मी लोकांच्या भावनांचा आदर करतो. त्यांनी म्हटलेल्या प्रत्येक गोष्टींचा मी गांभीर्याने विचार करतो.  जेव्हा तुम्ही अशा गोष्टीचा भाग असता, ज्यामुळे काही लोकांना त्याचा त्रास होतो,  तेव्हा तुम्ही ती गोष्ट करताना थांबता. ती गोष्ट तुम्हाला ऐकण्यास भाग पाडते".

"एक अभिनेता म्हणून मी कोणत्याही चित्रपटाशी त्या पात्राद्वारे  आणि मी साकारत  असलेल्या कथेद्वारे जोडला जातो. या चित्रपटाचा कोणत्याही समुदायाबद्दल  कोणतीही टिप्पणी करण्याचा हेतू नव्हता.  नीरज पांडे यांच्यासोबत काम करत असताना, मी त्यांच्या चित्रपटांबद्दलच्या दृष्टिकोनात सातत्यपूर्ण गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहिली आहे.  लोकांच्या भावना लक्षात घेऊन, चित्रपट निर्मात्यांनी प्रमोशनल  मटेरिअल काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे", असं मनोज वाजपेयी यांनी स्पष्ट केलं.

 

यापूर्वी निर्माते नीरज पांडे यांनीही त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक नोट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'आमचा चित्रपट एक काल्पनिक  पोलीस ड्रामा आहे. पंडित हा शब्द फक्त एका काल्पनिक पात्रासाठी वापरण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा एखाद्याच्या कृती आणि निर्णयांवर केंद्रीत आहे. कोणत्याही जाती, धर्म किंवा समुदायावर भाष्य करत नाही किंवा त्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही', असं त्यांनी आपल्या पोस्टमधून स्पष्ट केलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.