अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच समस्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आले आहेत. सुनीताने गोविंदावर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला होता. तर गोविंदाने तिचे हे सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता सुनीताने पुन्हा एकदा व्लॉग पोस्ट केला असून त्यात गोविंदाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. “अनेकांनी माझ्या निरागसतेचा फायदा उचलला आहे. मी खूप काही सहन केलंय, परंतु आता आणखी सहन करणार नाही. मी आता स्वत:ची ओळख बनवली आहे. 40 वर्षांचं नातं रातोरात तुटत नाही. त्यामुळे मी थोडी भावूक असेनच. परंतु आता माझं मन मजबूत बनलंय”, असं सुनीता म्हणाली.
याविषयी ती पुढे म्हणाली, “मी नेहमी खरं तेच बोलते. मी प्रत्येक महिलेला सांगते की तिने आपल्या अधिकारांसाठी लढायला हवं. जेव्हा माझ्या सासरची मंडळी जवळ होती, तेव्हा मी गप्प होते. कारण मी त्यांचा खूप आदर करायची. परंतु आता गोविंदा आणि मी मित्र आहोत, तर का गप्प राहून मी त्यांचं ऐकत बसू किंवा घाबरून राहू. गोविंदा हे माझं बालपणीचं प्रेम आहे. जर तो बदलला आणि माझ्या नियमांनुसार जगू लागला, तर मी त्याला माफ करेन. माझ्याबद्दल दररोज बातम्यांमध्ये जे येतं, त्याकडे मी लक्ष देत नाही. इतका ताण झेलण्याचं माझं हे वय नाही. मी मेनोपॉजचा सामना करतेय. अशा वेळी तुम्हाला पती आणि मुलाबाळांच्या पाठिंब्याची गरज असते, दबावाची नाही,”
गोविंदाकडून याप्रकरणी कधीच स्पष्ट उत्तर मिळालं नसल्याचीही तक्रार सुनीताने केली आहे. “तो हसून या गोष्टीला टाळतो. आम्हाला त्यांची उत्तरं समजत नाहीत. गोविंदा त्याच्या आईला घाबरत होता. त्यांच्या निधनानंतर तो आता बेफिकिर झाला आहे. आता तो कोणालाच घाबरत नाही आणि त्याच्या मनासारखा वागतो. त्यांची संगत चांगली नाही. मी याआधीही म्हटलं होतं की, जर त्याचं कोणाशी अफेअर असेल तर काय झालं? मात्र प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं. तरुणपणीही खूप पार्ट्या केल्या आणि आयुष्याचा आनंद घेतला, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी एक वय असतं”, अशा शब्दांत सुनीताने नाराजी व्यक्त केली.