वाल्हे, ता. २० : ‘‘स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे जीवन, त्यांचा त्याग आणि राष्ट्रनिष्ठा चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता येते. अशा चित्रपटांमुळे समाजात जनजागृती होऊन नव्या पिढीला प्रेरणा मिळते,’’ असे मत सिने दिग्दर्शक प्रकाश पांचाळ यांनी व्यक्त केले.
गुळुंचे (ता. पुरंदर) येथे जय मल्हार ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कला महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राजकुमार धुरगुडे होते. याप्रसंगी सिनेअभिनेते विनोद शिंदे, पंचायत समिती सदस्या स्मिता निगडे, विजयकुमार हरिश्चंद्रे, संतोष निगडे, सचिन शिंदे, अमोल लोळे, कांचन निगडे, सोमनाथ खोमणे, सुदर्शन जैन, सुषमा भुंजे उपस्थित होते.
गेल्या अकरा वर्षांपासून संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘मार्तंड कलारत्न’ पुरस्कार यंदा दिग्दर्शक प्रकाश पांचाळ यांना प्रदान करण्यात आला. तसेच अशोकराव टाळकुटे यांना ‘शिक्षक मार्तंड शिक्षणरत्न’, जयवंत जाधव यांना ‘मार्तंड समाजभूषण रत्न’ आणि सुशील गायकवाड यांना राजकुमार धुरगुडे यांच्या हस्ते आदर्श ‘शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
संस्थेने गेल्या अकरा वर्षांत शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य केले असून पर्यावरण संवर्धन, निसर्गवृद्धी आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यास प्राधान्य दिले आहे.
यावेळी अशोकराव टाळकुटे यांनी विज्ञाननिष्ठ शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले तर राजकुमार धुरगुडे यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची समाजाला दिशा देण्यासाठी आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आणि अशा निर्मितीसाठी समाजानेही योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक सादरीकरणांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.