सासवड, ता. २२ : बनावट कागदपत्रे तयार करून आणि शासनाची दिशाभूल करून मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीवर स्वतःची वारस म्हणून नोंद केल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सन २०११ ते २०१४ या कालावधीत हा प्रकार घडला असून, याबाबत श्रीनाथ दत्तात्रेय कटके (वय ५५, रा. भारती विद्यापीठ, पुणे) यांनी सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार श्रीनाथ कटके यांचे आजोबा कृष्णा नारायण कटके यांच्या नावे भिवरी (ता. पुरंदर) येथे जमीन आहे. फिर्यादींनी या जमिनीवर वारस हक्काने नाव लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांना समजले की गावातीलच इतर व्यक्तींनी देखील कृष्णा कटके यांचे वारस असल्याचे सांगून अर्ज दिले आहेत. हा विषय न्यायालयात प्रलंबित असताना धक्कादायक माहिती समोर आली.
तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी त्यांचे वडील ‘किसन नारायण कटके’ यांचे नाव बदलून कागदपत्रांवर ‘कृष्णा नारायण कटके’ असे केले. या खोट्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांनी महसूल विभागाची फसवणूक केली आणि स्वतःची व आपल्या वारसांची नावे सातबारा उताऱ्यावर लावून घेतली. मूळ वारस जिवंत असताना आणि जमीन नावावर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच हा बनावट प्रकार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोपट किसन कटके, लालासाहेब दत्तात्रेय कटके, तुषार दत्तात्रेय कटके, सागर पोपट कटके, सुशीला दत्तात्रेय कटके, सुरेखा दत्तात्रेय कटके (सर्व रा. भिवरी) यांसह तीन मयतांची नावे तक्रारीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सासवडचे साहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.