Milind Gavli: 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनिरुद्ध भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी सगळ्यांच्याच लक्षात आहे. या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेला हा अभिनेता कायम वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीला सोडून संजनाशी प्रेमविवाह केल्यामुळे प्रेक्षकांचा तिरस्कार, नाराजी ओढवलेला हा अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र फार वेगळा आहे. अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेता मिलिंद गवळी यांनी आपल्या खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी विषयी सांगितलं आहे. द अनुरूप शो या कार्यक्रमात अभिनेता मिलिंद गवळी त्याच्या पत्नीसह आला होता. दहावीनंतर बघताक्षणी मुलीच्या प्रेमात पडला, आईलाही सांगितलं की लग्न करेन तर हिच्याशीच. अखेर ट्रेनमध्ये प्रेमाची कबुली दिली असं म्हणत आपली संपूर्ण लव स्टोरी या अभिनेत्याने या मुलाखतीत सांगितली आहे.
अभिनेता मिलिंद गवळी म्हणाले," माझ्या शिक्षणाची बोंब होती. 5-5 विषयात नापास लेणे माझ्यासाठी नवं नव्हते.10 वीला मी पास व्हावे म्हणून माझ्या बहिणीने शेगावला नवस बोललेला. मी पास झालो माझ्या टीचरनी बोर्डाला नाव दिली होती, त्यामुळे पास झालो. मग नवस फेडायला शेगावला जावं लागणार होतं. पण त्याआधी जळगावला एक लग्न अटेंड करून पुढे शेगावला जाऊ असं ठरले. माझी चिडचिड सुरु होती. मला आईने जबरदस्ती जळगावच्या लग्नाला नेलं. त्या लग्नाला गेल्यानंतर मला लाल ड्रेसमध्ये लांब सडक केस, सुंदर मुलगी दिसली आणि मी प्रेमात बहताक्षणी प्रेमात पडलो. माझं असं झालं की मी कायम शाळेत, घरी, खेळताना मुलींच्या घोळक्यात असायचो. तिथे माझ्या बाजूला आई बसलेली. मी तिला म्हणालो की मला या मुलीशी लग्न करायचंय. मी 10 वी पास. आईला म्हणालो की हिच्याशी लग्न करायचंय. ती शेवटी माझीच आई- ती म्हणाली किती गोड आहे, ही बहुतेक वंदनाची मुलगी आहे. तिने लगेच वंदूला बोलवलं. दोघी बसल्या. आई तिला म्हणाली की ही तुझी बहिण आहे का? ती म्हणाली हो,धाकटी बहीण आहे दिपू. आई वंदू मावशीला म्हणाली की हा काय म्हणतोय बघ की मला हिच्याशी लग्न करायचंय तिच्याशी. हे ऐकून वंदना म्हणाली, किती छान, दोघांचे लग्न झालं तर दोन्ही कुटुंब एकत्र येतील वेगैरे. त्यांच्या गप्पा सुरु होत्या.
मी हिला हात केला होता. आणि हिने तिच्या भावाच्या मागून मला हात दाखवत हाय केला होता. तिथे झालं कन्फर्म की तिलाही मी आवडतो. काही बोललो नाही. ती तिच्या भावाच्या गाडीत बसून निघून गेली. माझे ठरले की या मुलीशी लग्न करायचे. नंतर एकदा 6 महिन्यांनंतर हे सगळे शॉपिंगसाठी मुंबईत आले होते.
आमच्या घरी आलेल्या, मी तेंव्हा अकरावीत होतो. हम बच्चे, हिंदुस्तान के या चित्रपटात काम करत होतो. आमचं शूटिंग सुरू होतं. तोपर्यंत हे सगळे घरी येऊन गेले. मी रात्री घरी पोहोचलो मामा-मामी सगळे आले होते. जेवण करताना मम्मा म्हणाली भावना आणि दीपा येऊन गेल्या. त्या 9 वाजता जाणार आहेत धुळयाला परत. तुला भेटायचे होते त्यांना. मग मी रेल्वे स्टेशनला जातो म्हणत तडक गेलो. स्टेशनवर चकरा मारल्या, ट्रेन लेट होती. टॅक्सीमधून मावशी भावना आणि दीपाला येताना बघितलं. ''मग तिच्या डोळ्यात पाहिलं. मग मी मावशीच्या बॅगा घेतल्या आणि भावनाशी बोलत बसलो. हिच्याशी बोललोच नाही. काय बोलायचे कळेना. मग ट्रेन आली, सगळ्याना आत चढवलं आणि जायच्या आधी दीपाला म्हणालो I love you. Deepa...ती म्हणाली मी याचीच वाट बघत होते. टाटा केला. मला माहित नाही एवढी हिम्मत माझ्यात कुठून आली. असं मला याआधी कुठलाच मुलीला बघून वाटलं नव्हतं. हिला भेटलं की माझे कान लाल व्हायचे. मग घरातल्यांनी आमचं लग्न ठरवलं.