प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांना रुग्णलयात अॅडमिट असल्याचे वृत्त समोर आले होते. काल त्यांचा वाढदिवस होता, आणि काल रात्रीच त्यांना अटॅक आला अशीही बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांना लगेचच कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्तही समोर आले होते. मात्र संजय लीला भन्साळी यांच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या बातम्या या केवळ अफवा आहेत, त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं त्यांच्या टीमने सांगितलं आहे. त्यांच्या टीमने या संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे.
भन्साळींच्या टीमने काय सांगितलं ?
एसएलबी (संजय लिला भन्साली ) हे रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आणि निराधार आहे. या वृत्ता काहीही तथ्य नाही. अशा कोणत्याही कथा प्रसारित करू नका, कारण त्यांचा कोणताही व्हेरिफाईड स्रोत नाही, असं म्हणत त्यांच्या टीमने अफवा न पसरवण्याची विनंती केली आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरंतर सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल झाली होती, त्यामध्ये असा दाव करण्यात आला होता की संजय लीला भन्साळी यांना त्यांच्या वाढदिवशीच हार्ट अटॅक आला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे चाहते चिंतेत होते. मात्र अशा बातम्या समोर येऊ लागताच संजय लीला भन्साळी यांच्या टीमकडन ताबडतोब एक निवेदन जारी करण्यात आलं आणि त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं.या सर्व बातम्या निराधार असून केवळ अफवा असल्याचंही टीमने नमूद केलं. टीमच्या या स्पष्टीकरणामुळे चाहत्यांचा जीव मात्र भांड्यात पडला आहे.
संजय लीला भन्साळी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. ‘खामोशी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘हीरामंडी’ सारख्या अनेक उत्तम कलाकृती त्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत. सध्या ते ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात व्यस्त असून त्यामध्ये रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसा येणार असून चाहते त्यासाठी खूप उत्सुक आहेत.