The Kerala Story 2: मुलीने स्वत:ला शहीद करून घेतलं..; धर्मांतराबद्दल सांगताना आईने फोडला टाहो
Tv9 Marathi February 26, 2026 03:45 AM

‘द केरळ स्टोरी 2: गोज बियाँड’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात 16 बदल आणि कट्स सुचवले आहेत. त्यानंतर कोर्टाकडूनही हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट प्रचारकी आणि समाजात द्वेष पसरवणारा असल्याची टीका होत आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’चा हा सीक्वेल आहे. धर्मांतराच्या नावाखाली तरुणींची केली जाणारी फसवणूक हा गंभीर मुद्दा यात अधोरेखित करण्यात आला आहे. चित्रपटावरून वाद वाढत असताना निर्मात्यांनी सोमवारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत पीडितांना समोर आणलं.

या पत्रकार परिषदेत फरीदाबाद इथून आलेली एका पीडितेची आई अत्यंत भावूक झाली होती. 2020 मध्ये त्यांच्या मुलीची कथितरित्या गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “हे 20 ऑक्टोबर 2020 रोजी झालं होतं. माझ्या मुलीच्या सौंदर्यामुळे, तिच्या अभ्यासामुळे आणि एकतर्फी प्रेमामुळे.. माझी मुलगी शालेय अभ्यासक्रमात अव्वल होती आणि कॉलेजमध्येही ती सर्वांत हुशार होती. ती सामाजिक कार्यातही सहभाग घ्यायची आणि तिला जिथे बोलावलं जायचं, तिथे मी तिच्यासोबत जायची. कदाचित त्यांची नजर माझ्या मुलीवर पडली आणि त्यांनी बळजबरीने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.”

मुलीचं अपहरण करून तिला मुलाच्या घरी नेण्यात आलं आणि तिथे त्याच्या कुटुंबीयांनीही तिच्यावर धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव टाकल्याचा खुलासा पीडितेच्या आईने केला. मुलगी राजपूत होती आणि मुलगा मुस्लीम होता. त्यांच्या मुलीने आधी लग्नासाठी नकार दिला होता. मुलाच्या घरी एक वकीलसुद्धा उपस्थित होता, जेणेकरून निकाह होऊ शकेल, परंतु मुलीने स्पष्ट नकार दिला. जेव्हा आईला याविषयी समजलं, तेव्हा त्या मुलाच्या घरी गेल्या आणि तिथून मुलीला सुखरुप परत आणलं. त्यानंतर मुलाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतरही दोन-चार महिन्यांपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. कारण मुलाच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी होती. “त्याचे आजोबा, काका, भाऊ… सर्वजण राजकारणात होते. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांसोबत ते उठबस करायचे. त्यामुळे पुढे काहीच होऊ शकलं नाही”, असं आईने पुढे सांगितलं.

पीडितेच्या आईने दोन वर्षांनंतर पुन्हा मुलीचं शिक्षण सुरू केलं. परंतु जेव्हा मुलगी बी.कॉमची शेवटची परीक्षा द्यायला गेली, तेव्हा मुलाने तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. कॉलेजच्या बाहेर इतर दोन जणांसोबत तो उभा होता. मुलीने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलगा हातात बंदूक घेऊन कारने तिचा पाठलाग करत होता. “माझ्या मुलीने हार मानली नाही आणि लढाई लढता लढता तिने स्वत:लाच शहीद केलं. मी तिला शहीदच म्हणेन. कारण आपल्या धर्मासाठी तिने आपलं बलिदान दिलं, परंतु तडजोड केली नाही”, असं सांगताना आई भावूक झाली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.