राहू, ता. २४ : राहू परिसरात गेल्या आठवड्यापासून एअरटेल, व्ही.आय.च्या नेटवर्कमुळे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. कंपनीचे महागडे रिचार्ज करूनही इंटरनेट तसेच मोबाईल वरील इन्कमिंग, आउटगोइंग व्यवस्थित होत नसल्याने संभाषण अस्पष्ट होते. वारंवार आवाज खंडित होत आहे. यामुळे ग्राहक वैतागले आहेत.
राहू परिसरातील सोनवणे डेअरी फार्म, काळे वस्ती, शिंदे मळा, कुलवस्ती, राहू, सहकारनगर, मेमाणवाडी आदी गावात मोठ्या प्रमाणात कंपनीचे मोबाईल धारक आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून मोबाईल निकामी ठरू लागले आहेत. मोबाईलवरून संभाषण अस्पष्ट होत आहे. तसेच इंटरनेट देखील धिम्या गतीने चालत आहे. त्यामुळे ग्राहक संतापले आहेत. महागडे रिचार्ज करून देखील या कंपन्या ग्राहकाला चुना लावण्याचे काम करतात.
भागातील मनोऱ्यात तांत्रिक अडचण असावी, असे ग्राहकामध्ये बोलले जात आहे. तातडीने कंपनीने लक्ष घालून मोबाईल सेवा दुरुस्ती करावी. अशी मागणी या भागातील ग्राहकांकडून होत आहे.
अन्यथा सिम कार्ड पोर्ट करणार..!
एअरटेल , व्ही आय, कंपनीचे नेटवर्क अनेक दिवसांपासून बिघडले आहे. आम्ही इतक्या महागाईचे रिचार्ज करून काय उपयोग होत नाही .दोन दिवसात नेटवर्क प्रॉब्लेम दुरुस्त न झाल्यास येथील अनेक ग्राहक सदर कंपनी मधून इतर कंपनीकडे सिम कार्ड पोर्ट करणार आहे, असे माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नवले यांनी सांगितले.