Marathi Bhasha Gaurav Diwas : मराठीतील या जागतिक दर्जाच्या कविता, तुमचं जगणंच नव्हे, आयुष्याचा दृष्टिकोनच बदलेल… 5 वी कविता तर…
Tv9 Marathi February 27, 2026 07:45 PM

मराठी आपुली बोली, आपली भाषा, आपुला बाणा… प्रत्येक मराठी नागरिकाला अभिमान वाटावा असा आजचा दिवस. ज्येष्ठ कवी, लेख वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, मराठी संस्कृती आणि साहित्याचा हा गौरव दिन म्हणून आजच्या या दिवसाला विशेष महत्व आहे. मराठीत अमाप लेखन झालं, विविध लेखक, कवींनी त्यांच्या साहित्याने ही भाष समृद्ध केली आहे.

आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नामवंत मराठी लेख ज्यांची किर्ती फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नव्हे तर सर्व सीमा ओलांडून त्यांचं नाव सातासमुद्रापारही गेलं, अशा लेखकांच्या कवींच्या काही गाजलेल्या कविता खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आपल्यापैकू अनेकांनी य कविता कधी ना कधी वाचलव्या असतील, काही तर तोंडपाठही असतील.

पाहूया काही नामवंत कवींच्या कविता…

1) लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…

‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ हे सुरेश भट यांनी लिहिलेले विख्यात मराठी अभिमान गीत आहे. मराठी भाषेचा गोडवा, तिची संस्कृती आणि महाराष्ट्राची अस्मिता याचे या चपखल वर्णन आहे.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्याच घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

दंगते मराठी, रंगते मराठी
स्पंदते मराठी, गर्जते मराठी
गुंजते मराठी ,गर्जते मराठी

2) ओळखलंत का सर मला- कणा – कुसुमाग्रज

ज्यांच्या जन्मदिवसानिमित्त आज मराठी गौरव दिन साजरा केला जातो, त्या कुसमाग्रजांच्या अत्यंत गाजलेल्या आणि लोकप्रिय अशा कणा कवितेपासूनच सुरूवात करूया. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना ही कविता तोंडपाठ असेलच. तुम्हीही वाचून पहा..

“ओळखलंत का सर मला?” पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलाला वरती पाहून,
गंगामाई आली पाहुणी, गेली घरट्यात राहून,
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली,
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले,
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.

3) प्रेम कर भिल्लासारखं – कुसुमाग्रज

ही कविताही कुसुमाग्रज यांचीच असून अत्यंत गाजलेली आहे.

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!

4) रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो- नामदेव ढसाळ

प्रख्यात विचारवंत, कवी, लेखक नामदेव ढसाळ यांचं लेखन माहीत नाही, वाचलं नाही असा माणूस विरळच. त्यांची ही कविता त्यांच्या अगाध प्रतिभेची साक्ष देते. ‘ रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो’ ही विद्रोही कविता त्यांच्या ‘गोलपिठा’ (1972) या गाजलेल्या काव्यसंग्रहातील एक अत्यंत आक्रमक आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी कविता आहे.

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून…
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिंदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला …

5) आई एक नाव असतं- फ मुं शिंदे

फ. मुं. शिंदे यांची “आई एक नाव असतं” ही एक अत्यंत लोकप्रिय आणि भावूक मराठी कविता आहे, आईचं घरातील, आपल्या आयुष्यातील महत्व यातून अतिशय सुंदरपणे मांडलं आहे. घरातील महत्त्व सांगते.

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही.

जत्रा पांगते, पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही.

आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतली जागा
घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान.

पिकं येतात जातात
आभाळच जसं सांडून जातं
आठवणींची पोतडी घेऊन
आई नावाचं भरलेलं गाव उरतं.

आई खरच काय असते?
लंगड्याचा पाय असते
वासराची गाय असते
दुधावरची साय असते
लेकराची माय असते.

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.

6) मन वढाय वढाय – बहिणाबाई चौधरी

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची “मन वढाय वढाय” ही अत्यंत लोकप्रिय खानदेशी (लेवा गणबोली) कविता आहे. या कवितेत त्यांनी चंचल मनाचे वर्णन उभ्या पिकातील ढोरासारखे केलं आहे.

मन वढाय वढाय, उभ्या पीकांतलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं, जसं वारा वाहादन ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर
आरे इचू, साप बरा, त्याले उतारे मंतर ।।

मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

7) अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली- सुरेश भट

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जातं. उष:काल होता होता काळरात्र झाली ही त्यांची कविता अत्यंत गाजली. अनेकांना ती मुखोद्गत असेलही..

उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली, अरे पुन्हा…

तिजोऱ्यांत केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळमाती
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतंही न वाली, अरे पुन्हा…

उभा देश झाला आता एक बंदिशाळा
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली, अरे पुन्हा…

धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आंसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली, अरे पुन्हा…

उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

8) दोन दिवस – नारायण सुर्वे

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.