भारतीय संघाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 26 फेब्रुवारीला सुपर 8 फेरीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात झिंबाब्वेवर विजय मिळवला. भारताने हा सामना जिंकून सेमी फायनलमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. टीम इंडियाच्या पहिल्या 6 फलंदाजांनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारताला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारता आली. भारताने 256 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांसमोर झिंबाब्वेला 184 धावांपर्यंतच पोहचता आलं. झिंबाब्वे विरुद्धच्या सामन्यात तिलक वर्मा याने 16 बॉलमध्ये 275 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 44 रन्स केल्या. तिलकने या खेळीत 4 सिक्स आणि 3 फोर लगावले.
तिलकने झिंबाब्वे विरूद्धच्या सामन्याआधी 5 डावांत 106 धावा केल्या होत्या. त्यामुळे तिलकच्या कामगिरीवरुन प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र तिलकने झिंबाब्वे विरुद्ध नाबाद 44 धावा करत धमाका केला. झिंबाब्वे विरूद्धच्या सामन्यात तिलकच्या बॅटिंगच्या स्थानात बदल करण्यात आला. तिलक आतापर्यंत तिसऱ्या स्थानी बॅटिंग करायचा. मात्र तिलक झिंबाब्वे विरुद्ध सहाव्या स्थानी बॅटिंगसाठी आला. तिलकसाठी हा निर्णय फायदेशीर ठरला. तिलकने भारताच्या विजयानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केलं. तिलकने या दरम्यान काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
तिलकने विजयाचं श्रेय टीम इंडियाच्या सलामी जोडीला दिलं. तसेच पावरप्लेमध्ये विकेट गेले तरीही आक्रमकपणे खेळायचं ठरलेलं, असंही तिलकने म्हटलं.
“जेव्हा सलामी फलंदाज चांगली सुरुवात करतात तेव्हा तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी येणाऱ्यांच्या विश्वासात वाढ होते. संजू सॅमसन याने आज जे काही केलं ते अप्रतिम होतं. संजूनंतर आम्ही फटकेबाजी केली”, असं म्हणत तिलकने संजूच्या खेळीचं कौतुक केलं. टीम इंडियासाठी झिंबाब्वे विरुद्ध संजू सॅमसन-अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 48 धावांची भागीदारी केली. तसेच संजूने अवघ्या 15 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह 24 रन्स केल्या.
“पावरप्लेमध्ये भले 3-4 विकेट्स गेल्या तरीही आपण आक्रमकपणे खेळणं सोडायचं नाही याबाबत आमचं बोलणं झालं होतं. आम्ही प्रत्येक बॉलवर फटकेबाजी करण्यासाठी सज्ज आहोत हे प्रतिस्पर्धी संघाला दाखवून द्यायचंय आहे”, असं तिलक म्हणाला.
तिलकची संजूच्या खेळीवर प्रतिक्रिया
दरम्यान तिलकने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिल्या 5 सामन्यांत अनुक्रमे 25,25,25,31 आणि 1 धावा केल्या होत्या. तिलकला साखळी फेरीतील चारही सामन्यांत चांगली सुरुवात मिळाली. मात्र तिलक मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. मात्र तिलकने झिंबाब्वे विरुद्ध स्फोटक खेळी करत फिनिशिंग टच दिला.