उमेश झिरपे - umzirpe@gmail.com
हिमनद्यांचे संवर्धन फक्त हिमालयापुरते मर्यादित नाही; पृथ्वीच्या संतुलनासाठी ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या तितक्याच किंबहुना अधिक महत्त्वाच्या आहेत. यातील दक्षिण ध्रुवावर वसलेला अंटार्क्टिका हा केवळ बर्फाचा खंड नाही, तर पृथ्वीच्या हवामान यंत्रणेचा केंद्रबिंदू, समुद्रपातळीचा रक्षक आणि जागतिक पर्यावरणाचा मौन संरक्षक आहे.
हिमालयाच्या पलीकडेदेखील असे काही प्रदेश आहेत, हिमनद्या आहेत, ज्या तुमच्या-आमच्या भविष्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच चला, हिमालयाच्या पलीकडे जाऊया. कारण हिमनद्यांचे संवर्धन फक्त हिमालयापुरते मर्यादित नाही; पृथ्वीच्या संतुलनासाठी ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या तितक्याच किंबहुना अधिक महत्त्वाच्या आहेत. यातील दक्षिण ध्रुवावर वसलेला अंटार्क्टिका हा केवळ बर्फाचा खंड नाही, तर पृथ्वीच्या हवामान यंत्रणेचा केंद्रबिंदू, समुद्रपातळीचा रक्षक आणि जागतिक पर्यावरणाचा मौन संरक्षक आहे. जगाच्या नकाशावर तो दूर, निर्जन आणि मानवी जीवनापासून अलिप्त वाटतो; पण प्रत्यक्षात येथे घडणाऱ्या बदलांचे परिणाम संपूर्ण पृथ्वीवर जाणवतात. हिमालयातील हिमनद्या आशियातील नद्यांना जन्म देतात, तर अंटार्क्टिकातील हिमनद्या संपूर्ण जगाच्या समुद्रांचे भविष्य ठरवतात. या हिमनद्यांचे भविष्य सुरक्षित राहिले तरच जगातील सर्वांचे जीवन सुरक्षित व सुखकर राहू शकते.
Premium|Milam Glacier Trek : विस्मृतीत गेलेली 'मिलम हिमनदी' आजही का मानली जाते साहसप्रेमींसाठी सर्वात कठीण आव्हान?अंटार्क्टिका हा पृथ्वीवरील सर्वांत थंड, सर्वांत कोरडा आणि सर्वांत वाऱ्याचा वेग असलेला खंड आहे. हिवाळ्यात तापमान उणे ६० ते उणे ८० अंश सेल्सिअसपर्यंत घसरते, तर काही अंतर्गत भागांमध्ये ते उणे ९० अंशांपर्यंतही नोंदवले गेले आहे; परंतु या कठोर वातावरणामागे एक विलक्षण वास्तव दडलेले आहे, पृथ्वीवरील सुमारे ९० टक्के बर्फ आणि सुमारे ७० टक्के गोडे पाणी याच खंडात साठलेले आहे. हा हिम किंवा बर्फ केवळ पृष्ठभागावर नसून, प्रचंड जाडीच्या हिमपत्राच्या स्वरूपात आहे. काही ठिकाणी या बर्फाची जाडी चार किलोमीटरपर्यंत जाते. या हिमपत्रातून हजारो हिमनद्या तयार होतात आणि त्या संथ गतीने समुद्राकडे सरकत राहतात. हिमालयात हिमनद्या पर्वतदऱ्यांमधून वाहतात, पण अंटार्क्टिकात संपूर्ण खंडच बर्फाने झाकलेला असल्याने हिमनद्या विशाल बर्फाच्या मैदानातून पुढे सरकतात आणि शेवटी समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या पट्ट्यांमध्ये रूपांतरित होतात. या पट्ट्यांना ‘आइस शेल्फ’ म्हणतात, यातील काही आइस शेल्फ इतके मोठे आहेत की त्यांचे क्षेत्रफळ एखाद्या देशाइतके असते.
अंटार्क्टिकामध्ये छोट्या मोठ्या अनेक हिमनद्या आहेत. यातील लॅम्बर्ट, थ्वाइट्स, पाइन आयलंड, टॉटन आणि बिअर्डमोर या हिमनद्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. लॅम्बर्ट हिमनदी ही जगातील सर्वांत मोठ्या हिमनद्यांपैकी एक असून तिची लांबी शेकडो किलोमीटर आहे. थ्वाइट्स आणि पाइन आयलंड या हिमनद्या मात्र वैज्ञानिकांच्या विशेष चिंतेचा विषय बनल्या आहेत. कारण त्या समुद्राशी थेट संपर्कात असल्याने उबदार समुद्री पाणी त्यांच्या तळाशी पोहोचते आणि त्या आतून वितळू लागतात. या प्रक्रियेला ‘बेसल मेल्टिंग’ असे म्हणतात. ही वितळण्याची पद्धत धोकादायक मानली जाते, कारण ती वरून दिसत नाही, पण हिमनदीची संरचना कमकुवत करते. थ्वाइट्स हिमनदीला तर “डूम्सडे ग्लेशियर” असेही म्हटले जाते, कारण तिचा ढासळता वेग कायम राहिला तर समुद्रपातळी वाढीचा वेग अचानक वाढू शकतो.
अंटार्क्टिकातील बर्फ पृथ्वीच्या तापमान संतुलनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. बर्फ सूर्यप्रकाशाचा मोठा भाग परावर्तित करतो, ज्यामुळे पृथ्वीवर उष्णता कमी साठते. या प्रक्रियेला अल्बेडो प्रभाव म्हणतात. जर बर्फ कमी झाला, तर पृथ्वी अधिक उष्णता शोषू लागेल आणि तापमानवाढ आणखी वेगाने होईल. त्यामुळे अंटार्क्टिका हा पृथ्वीचा नैसर्गिक थंडावा राखणारा कवच आहे. त्याचप्रमाणे समुद्रपातळी नियंत्रित करण्यामध्येही या हिमनद्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. वैज्ञानिकांच्या मते, अंटार्क्टिकातील संपूर्ण बर्फ वितळला, तर जागतिक समुद्रपातळी सुमारे ५५ ते ६० मीटरने वाढू शकते. ही घटना तातडीने घडणार नाही, पण वितळण्याचा वाढता वेग भविष्यातील गंभीर संकटाची चिन्हे दाखवतो. जर असे आज घडलेच, तर जगातील प्रमुख शहरे, अनेक छोटे मोठे देश पाण्याखाली जातील, यात पृथ्वीची आजची किमान १५-२०% लोकसंख्या थेट प्रभावाखाली येऊ शकते; म्हणूनच या गोष्टीकडे शास्त्रज्ञ खूप गंभीरतेने बघत आहेत.
उपग्रह मोजमापानुसार अंटार्क्टिका दरवर्षी सुमारे १५० अब्ज टन बर्फ गमावत आहे. विशेषतः पश्चिम अंटार्क्टिका अधिक अस्थिर मानला जातो. कारण तेथील बर्फाचा मोठा भाग समुद्राच्या पातळीखालील भूभागावर टिकून आहे. त्यामुळे समुद्राचे तापमान वाढले की उबदार पाणी थेट हिमनद्यांच्या पायाशी पोहोचते. ही प्रक्रिया एकदा वेग घेतली की थांबवणे कठीण होते. काही वैज्ञानिकांच्या मते, पश्चिम अंटार्क्टिकातील काही हिमनद्या ‘अपरिवर्तनीय वितळण’ या टप्प्यात पोहोचल्या असू शकतात. अंटार्क्टिकातील हिमनद्या वितळण्याचे परिणाम केवळ समुद्रपातळी वाढीपुरते मर्यादित नाहीत. महासागरातील खारटपणा, तापमान आणि प्रवाहांची दिशा यावरही त्याचा परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात गोडे पाणी समुद्रात मिसळल्यास महासागरातील उष्णता वहन प्रणाली विशेषतः थर्मोहॅलाइन सर्क्युलेशन प्रभावित होऊ शकते. याचा परिणाम जागतिक हवामान पद्धतीवर, पावसाच्या चक्रावर आणि मॉन्सूनवरही होऊ शकतो. त्यामुळे अंटार्क्टिकातील बदल भारतासारख्या दूरच्या देशांवरही अप्रत्यक्ष परिणाम करू शकतात.
या बर्फामध्ये पृथ्वीच्या हवामान इतिहासाचे अभिलेखही साठलेले आहेत. बर्फाच्या थरांमध्ये अडकलेल्या सूक्ष्म हवेच्या फुग्यांमुळे हजारो वर्षांपूर्वीचे वातावरण कसे होते याची माहिती मिळते. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण, तापमानातील बदल, ज्वालामुखींचे परिणाम, या सर्वांचा अभ्यास या बर्फातून केला जातो. त्यामुळे हिमनद्या म्हणजे पृथ्वीचे नैसर्गिक संग्रहालय आहेत.
अंटार्क्टिकातील जीवनही बर्फाशी घट्ट जोडलेले आहे. पेंग्विन, सील, व्हेल आणि सूक्ष्म क्रिल या जीवांचे अस्तित्व समुद्री बर्फावर अवलंबून आहे. विशेषतः क्रिल हा सूक्ष्म जीव संपूर्ण अंटार्क्टिक समुद्री अन्नसाखळीचा पाया आहे. समुद्री बर्फाखाली वाढणाऱ्या सूक्ष्म वनस्पतींवर क्रिल जगतो आणि त्यावर मोठे समुद्री प्राणी अवलंबून असतात. बर्फ कमी झाला, तर संपूर्ण अन्नसाखळी ढासळू शकते. त्यामुळे हिमनद्या वितळणे म्हणजे जैवविविधतेसाठीही गंभीर धोका आहे. मानवी हस्तक्षेप येथे तुलनेने कमी असला तरी हवामान बदलाचा प्रभाव प्रचंड आहे. औद्योगिक क्रांतीपासून वाढलेले हरितगृह वायू पृथ्वीचे तापमान वाढवत आहेत. महासागर उबदार होत आहेत आणि त्याचा परिणाम ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक होत आहे. तरीही अंटार्क्टिका हा आंतरराष्ट्रीय करारांद्वारे संरक्षित प्रदेश आहे. येथे सैनिकीकरणास मनाई आहे, खनिज उत्खननावर बंदी आहे आणि वैज्ञानिक संशोधनाला प्राधान्य दिले जाते. अनेक देश येथे संयुक्तपणे संशोधन केंद्रे चालवतात. हा पृथ्वीवरील दुर्मिळ प्रदेश आहे जिथे मानवाने जाणीवपूर्वक निसर्गाला प्राधान्य दिले आहे.
भविष्यातील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे जागतिक तापमानवाढ मर्यादित ठेवणे. कारण अंटार्क्टिकातील हिमनद्या स्थानिक नाहीत, त्या संपूर्ण पृथ्वीच्या संतुलनाचा भाग आहेत. हिमालयातील हिमनद्या आशियातील लोकांना पाणी देतात, तर अंटार्क्टिकातील हिमनद्या संपूर्ण जगाच्या समुद्रांचे भविष्य ठरवतात.
अंटार्क्टिकाकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते, निसर्गाचा समतोल अत्यंत नाजूक आहे. हजारो वर्षांत तयार झालेली बर्फाची संरचना काही दशकांत बदलू शकते. हिमालयात उभं राहिलं की हिमनदी जीवनरेषा वाटते; अंटार्क्टिकाकडे पाहिलं की ती पृथ्वीचा श्वास वाटते. ती शांत आहे, संथ आहे, पण तिच्या अस्तित्वावर संपूर्ण ग्रहाचे संतुलन अवलंबून आहे. म्हणूनच हिमनद्यांचे संरक्षण ही केवळ पर्वतांची किंवा ध्रुवांची समस्या नाही; ती मानवजातीच्या भविष्यासाठीची गरज आहे. हिमालय असो किंवा अंटार्क्टिका, बर्फ जिथे आहे, तिथे जीवनाचे बीज दडलेले आहे. त्या बर्फाचा आदर करणे, त्याचे संवर्धन करणे आणि हवामान बदलाला आळा घालणे हेच पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित पृथ्वी देण्याचे खरे साधन आहे. अंटार्क्टिकातील हिमनद्या आपल्याशी बोलत नाहीत, त्या इशारे देत नाहीत, पण त्या शांतपणे एकच संदेश देत आहेत, पृथ्वीचा समतोल राखा; कारण हा बर्फ वितळला, तर फक्त समुद्र वाढणार नाहीत, तर मानवजातीचे भविष्यच बदलून जाईल.
(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक, गिरिप्रेमी आहेत.)