आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघ रियान परागच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्स संघात गेल्यानंतर कर्णधारपदाची सूत्र त्याच्या हाती आली आहे. राजस्थान रॉयल्सने 2008 मध्ये पहिलं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर जेतेपदाची झोळी रितीच आहे. 17 पर्वात पर्वात फक्त एकदाच अंतिम फेरी गाठता आली आणि त्यातही पराभव झाला. त्यामुळे यंदाच्या पर्वात रियान परागवर मोठी जबाबदारी असणार आहे. या स्पर्धेसाठी त्याच्या रणनितीचा कस लागणार आहे. असं असताना कर्णधार रियान परागने वैभव सूर्यवंशीला एक सल्ला दिला आहे. वैभव सूर्यवंशीने मैदानात किंवा मैदानाबाहेर कोणताही अतिरिक्त भार न घेता खेळाचा आनंद लुटला पाहिजे. असं सांगत त्याने वैभव सूर्यवंशीला पत्रकार परिषदांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. इतकंच काय तर मीडियालाही विनंती केली की त्याच्या मॅनेजरशी संपर्क करू नका.
रियान परागने वैभव सूर्यवंशीबाबत सांगितलं की, ‘कर्णधार म्हणून माझा एकच संदेश असले की त्याने जास्तीच्या पत्रकार परिषदा घेऊ नयेत. तसेच मीडियालाही फॉलो करू नये. त्याला त्याच्या खेळाचा आनंद लुटू द्या. मी तुम्हाला विनंती करतो की, त्याच्या मॅनेजर किंवा इतर कोणाशी संपर्क साधू नका. तो आता 15-16 वर्षांचा मुलगा आहे. त्याला क्रिकेट खेळू द्या. तो खरंच चांगलं क्रिकेट खेळत आहे आणि देशाला एक दिवस त्याचा अभिमान वाटेल. ‘ इतकंच काय तर वैभव सूर्यवंशीला आक्रमक खेळण्याची पूर्ण सूट दिली जाईल, असंही रियान पराग पुढे म्हणाला आहे. त्याचा वरिष्ठ साथीदार यशस्वी जयस्वाल दबाव झेलण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
वैभव सूर्यवंशीने मागच्या पर्वात आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. सात सामन्यात 36 च्या सरासरीने 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि एक अर्धशतकांचा समावेश होता. रियान पराग म्हणाला की, ‘त्याच्यावर थोडा दबाव असेल, पण मी त्याला सांगेन की जे काही प्रेशर असेल ते जयस्वाल सांभाळून घेईल. कारण ही भूमिका पार पाडण्यास सक्षम आहे. वैभवला फक्त एक संदेश आहे की त्याने क्रिझवर जाऊन खेळावं. जर पहिल्या चेंडूवर हिट करायचा असेल तर कर.. यात काही अडचण नाही. मला वाटतं मागच्या एक वर्षात युवा खेळाडू म्हणून त्याने जे काही केलं, ते इतरांना जमलेलं नाही. तो प्रत्येक ठिकाणी धावा करत आहे.’