आयपीएल 2026 स्पर्धेत बऱ्याच खेळाडूंचं पुढचं भवितव्य कळणार आहे. कारण या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक मोठी संधी आहे. असं असताना टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुबमन गिलसाठीही ही स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे. कारण टी20 संघात जागा मिळावायची असल्यास त्याला या स्पर्धेत चांगली कामगिरी करणं भाग आहे. कारण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत शुबमन गिल संघाचा भाग नव्हता. त्याला संघात जागा मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे. कारण 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याला खेळण्याची संधी येथूनच मिळू शकते. त्यामुळे अनेकांनी शुबमन गिलला टी20 क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करून दाखवावं असं मत व्यक्त केलं आहे. त्यावर शुबमन गिलने रोखठोक उत्तर दिलं आहे.
आयपीएल स्पर्धेत शुबमन गिल गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करत आहे. शुबमन गिलला विचारलं गेलं की, टी20 संघातून बाहेर असल्याने पुन्हा भारतीय जर्सीत दिसण्यासाठी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागेल. यावर शुबमन गिलने उत्तर दिलं की, आयपीएलमध्ये धावा करत आहे आणि कोणाला काय सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. शुबमन गिल म्हणाला की, ‘जर तुम्ही मागचे तीन चार आयपीएल सिझन पाहाल तर मी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहे. त्यामुळे मला वाटतं की मला स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. या संघासाठी मागच्या चार वर्षात खूप चांगली कामगिरी केली आहे.’
‘मी एक फलंदाज म्हणून संघासाठी खूपच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मला सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. एक टीम म्हणून आम्हीला चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. जर आम्ही असं केलं तर नक्की आम्ही पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकू’, असं शुबमन गिल पुढे म्हणाला. ‘प्रामाणिकपणे सांगायचं तर, मी वैयक्तिक विक्रमांकडे लक्ष देत नाही. आयपीएल खेळत आहे आणि तुम्ही जिंकण्यासाठीच खेळता. हेच माझं ध्येय आहे. माझं वैयक्तिक लक्ष्य यावेळी ट्रॉफी जिंकण्याकडे आहे.’, असं शुबमन गिलने ठामपणे सांगितलं.