नाशिक: स्वयंघोषित 'कॅप्टन' आणि भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या गुन्ह्यांची व्याप्ती आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. खरात (Ashok Kharat) हा मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती लागली आहे. परदेशात बेकायदेशीरपणे पैसे पाठवण्यासाठी खरात या मार्गाचा वापर करत होता, असे सूत्रांकडून समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या (Ashok Kharat) या हवाला व्यवहारांचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत पोहोचले आहेत. भारतातून दुबईला आणि तिथून पुन्हा भारतात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाण-घेवाण खरातच्या माध्यमातून होत होती. यासाठी त्याने काही खासगी एजंट्स आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर केल्याचे SIT ला मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे.(Ashok Kharat)
विशेष म्हणजे, खरातचे हे काळे धंदे सुरळीत सुरू राहण्यासाठी त्याला काही बड्या राजकीय नेत्यांनी, वजनदार भक्तांनी आणि काही भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या पाठबळामुळेच इतक्या मोठ्या स्तरावर हा आर्थिक गुन्हा राजरोसपणे सुरू होता.(Ashok Kharat)
SIT ला खरातच्या व्यवहारांच्या काही डायऱ्या, डिजिटल पुरावे आणि बँक ट्रान्झॅक्शन्सचे तपशील मिळाले आहेत. या पुराव्यांवरून हा आर्थिक गुन्हा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून, यामध्ये परकीय चलन विनिमय कायद्याचे (FEMA) उल्लंघन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता, यामध्ये आता सक्तवसुली संचालनालय (ED) देखील हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.
भोंदू अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हेल्पलाइन नंबरवर तक्रारींचा पाऊस पडत आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून, यामध्ये ७० टक्के तक्रारदार महिला असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, फोनवरून माहिती देणाऱ्या अनेक महिला आणि नागरिक प्रत्यक्षात लेखी तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. खरातची दहशत किंवा सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी तक्रारदार लेखी तक्रार देण्यास कचरत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, एसआयटीचे अधिकारी आता तक्रारदारांशी संवाद साधून त्यांना पूर्ण सुरक्षिततेची हमी देत आहेत आणि त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून या भोंदू बाबाविरोधात सबळ पुरावे गोळा करून कायदेशीर कारवाई अधिक कडक करता येईल.