Nana Patole : राज्य सरकारच्या कर्जमुक्ती धोरणाची योग्य अंमलबजावणी न झाल्यास सहकारी संस्था आणि बँका डबघाईस येतील आणि शेतकरी कर्जबाजारी होईल, अशी भीती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. 80 टक्के शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर तर 100 टक्क्यांकडे मोटारसायकली आहेत. मग गरीब शेतकरी कसा निवडणार? असा सवाल नाना पटोलेंनी सरकारला केला आहे. सरकारच्या कर्जमुक्ती योजनेच्या एसओपीवर पटोलेंनी खरमरीत टीका केली आहे.
नाचता येईना अंगण वाकडं अशी भूमिका त्यांची आहे. मार्चला कर्ज थकीत होतं आणि आता एसओपी कशाची तयार करतायेत माहित नाही. निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु अशा घोषणा झाल्या आहेत. त्यावेळेसचं एसओपी सांगायला पाहिजे होती. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आश्वासन दिलं होतं. मात्र, आता पात्र शेतकरी कोण आहेत हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे 31 मार्चच्या पूर्वी जे कर्ज भरण्याची प्रक्रिया होती ती आता थांबवली आहे. त्यामुळं सेवा सहकारी संस्था सुद्धा डबघााईस जातील. जिल्ह्याच्या को-ऑपरेटिव्ह बँका सुद्धा डबघाईस जातील. शेतकऱ्यांवर उलट कर्ज चढेल. म्हणून सरकारनं तातडीनं पात्र शेतकरी कोण? ट्रॅक्टर आणि मोटरसायकल शंभर टक्के शेतकऱ्यांकडे बघायला मिळणार आहे. ट्रॅक्टर 80 टक्के तर मोटरसायकल 100 टक्के शेतकऱ्यांकडे आहे, त्यामुळे पात्र म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींची स्थिती समजून सांगितली पाहिजे असे पटोले म्हणाले. सरकारला कोणाचं कर्ज माफ करायचंय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधानांनी स्वतःच संसदेत घोषणा केली आहे की कोरोना सारखी परिस्थिती निर्माण होईल, म्हणजेच त्यांनी लोकांना पॅनिक केलं. आता सांगतात की पॅनिक होऊ नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. देशाचे प्रधानमंत्री जर लोकसभेत घोषणा करीत असतील आणि ते स्वतः लोकांना पॅनिक करीत असतील तर. गॅस, डिझेल, पेट्रोल याचा आता देशात तुटवडा होत आहे. जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर मांडली पाहिजे. प्रत्येकाला या गोष्टी पुढे जावंच लागणार आहे असे पटोले म्हणाले.
सरकार म्हणते की आमच्याजवळ गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा साठा भरपूर आहे. मग, वास्तविकता काय आहे. ती लोकांच्या समोर मांडली पाहिजे. एकीकडे दररोज पेट्रोल पंप समोर रांगा दिसतात. ही वस्तुस्थिती सरकारने मांडावी. कोणी अफवांवर विश्वास ठेवू नये, वास्तविकता आपण जी बघतोय ती वास्तविकता वेगळी असल्याचा टोला नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या मन की बात वर लगावला.