Eknath Shinde : सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर नेऊन पर्यटनाचे हब बनविण्यासाठी शासन कटिबध्द
esakal April 06, 2026 11:45 PM

कऱ्हाड - सातारा हा जगातील सर्वसंपन्न जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असुन महाबळेश्वर पर्यटनाचा कंठमनी आहे. जिल्ह्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर नेण्यासासाठी जिल्ह्याला पर्यटनाचे हब बनविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. त्यासाठी कोयना दौलत डोंगरी महोत्सवांतुन जनजागृती करता येईल. नवीन महाबेश्वरच्या माध्यमातुन ५५० गावातील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्याच गावात रोजगार मिळवून देण्यात येईल. मात्र कोणीही जमीनी विकु नका असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा सांगता प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील, व्यवस्थापक निलेश घटने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन विकासासाठी व महाबळेश्वरवरील पर्यटकांचा ताण कमी करुन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन महाबळेश्वर विकसित केले जात असे सांगुण उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, नवीन महाबळेश्वरमुळे स्थानिकांच्या जमिनींना चांगला भाव मिळुन ५५० गावातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. शहरांमध्ये नेहमीच मोठमोठे सांस्कृतिक महोत्सव होत असतात पण डोंगरी भागातील कष्टकऱ्यांना कोयना दौलत डोंगरी महोत्सवातुन सांस्कृतिक मेजवानी मिळत आहे.

यातून अनेक कलाकारांना देखील व्यासपीठ मिळत आहे. अजुन काही दिवस या महोत्सवाची मुदत वाढवावी. आपली बांधिलकी सर्वसामान्य लोकांशी आहे त्यातूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. सातारकर म्हणून मला अभिमान आहे. मी जरी उपमुख्यमंत्री असलो, तरी शेवटी सातारचा एक सामान्य शेतकरी पुत्र आणि कार्यकर्ता आहे. लोकांच्या कामासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीही भासू देणार नाही.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, डोंगरी महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुढील वर्षापासून या महोत्सवाचा कालावधी वाढवण्याची नागरिकांची मागणी आहे. एकनाथ शिंदे यांनी पाटण तालुक्यासाठी भरीव निधी दिला आहे. त्यांच्या निधीतील विविध कामांचे उद्घाटन आज झाले. त्यांच्यामुळेच तारळी धरणातील शंभर मीटर हेडवरून शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य झाले.

मोरणा-गुरेघर धरणातील पाणीही नदीपात्रात सोडण्यात आले असून, याचा फायदा दोन्ही तीरांवरील शेतकऱ्यांना झाला आहे. यापुढील काळातही पाटण तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यशराज देसाई यांनी आभार मानले.

पश्चिम महाराष्ट्र-कोकण जोडणार

वासोटा आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळांसाठी अर्थसंकल्पात रोपवे मंजूर करण्यात आला आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीसाठी पुलांची उभारणी केली जात आहे, असे सांगुण उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले कोयना नदीवर तापोळा आणि आपटी येथे मोठे पूल बांधले जात आहेत, ज्यामुळे दुर्गम भागातील १०५ गावे जोडली जातील आणि पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होईल.

उपमुख्यमंत्री म्हणाले...

* डिसेंबरमध्ये कोयना बॅकवॉटर फेस्टिवल घेणार

* जागतिक दर्जाचा महोत्सव होण्यासाठी प्रयत्न

* लाडक्या बहिणांनी ई-केवायसीसठी महिनाभर मुदतवाढ

* बोंडारवाडी धरणाच्या कामासाठी मंत्रालयात बैठक लावणार

* सातारा एमआयडीसीत मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न

* जिल्ह्यात म्हाडातुन घरे बांधण्यास निधी देणार

* गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनासाठी प्राधान्य

* कमी क्षेत्रासाठी क्लस्टर शेती उपक्रमास प्राधान्य

* जिल्ह्यात आठ हजार एकरवर बांबू लागवडीस शेतकऱ्यांची संमती

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.