कोकणात जाण्याचा मार्ग सुकर होणार
esakal April 09, 2026 08:45 PM

मुंबईकरांचा कोकण प्रवास निर्विघ्न
वसई-नायगाव-जूचंद्र कॉर्ड लाइनच्या कामाला वेग
विरार, ता. ९ (बातमीदार)ः वसई-नायगाव-जूचंद्र कॉर्ड लाइन प्रकल्पासाठी मोजणी वन विभाग, जिल्हाधिकारी, रेल्वेकडून केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील प्रवाशांचा कोकणचा प्रवास सुखकर आहे.
मुंबईची पश्चिमेकडील उपनगरे कोकण रेल्वेला जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने वसई-नायगाव-जुचंद्र कॉर्ड लाइन प्रकल्प हाती घेतला होता. या नव्या जोडमार्गामुळे दादर किंवा पनवेलवरून वळसा घालण्याऐवजी आता थेट मुंबईतून कोकण गाठणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाने प्रवाशांचा दोन ते चार तासांचा वेळ वाचणार आहे. जमिनीच्या अचूक मोजणीसाठी ५.१३ लाख रुपयांचे जेआरएम शुल्क प्रशासनाकडे जमा करण्यात आले आहे. तसेच येत्या १३ एप्रिल २०२६ रोजी जमिनीची प्रत्यक्ष संयुक्त मोजणीनंतर प्रकल्पातील खासगी तसेच सरकारी जमिनीचे नेमके चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
------------------------------------------
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
मंजुरी - १४ जुलै २०२३
खर्च - १७५.९९ कोटी
पश्चिम रेल्वे - ५.७३ किमी मार्ग
मध्य रेल्वे - १.५ किमीची मार्ग
प्रकल्पासाठीची जमीन - ८.०८ हेक्टर
मिठागरांची जमीन - ३.७७ हेक्टर
---------------------------------
ड्रोन सर्वेक्षण पूर्ण
- वन विभागासोबत जानेवारी २०२६ रोजी संयुक्त पाहणी पूर्ण करण्यात आली. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या पाहणीनंतर झाडांना मार्किंग करण्याचे काम सुरू आहे.
- भूसंपादन नकाशे, पर्यावरणीय परवानग्या, खारफुटी संदर्भातील प्रक्रियेसाठी ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तर रेल्वे मार्गिकेचा नकाशा, पुलाचे आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.