मोठी बातमी! नदीत बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू, 5 अजूनही बेपत्ता
Tv9 Marathi April 10, 2026 10:45 PM

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. 30 भाविक असलेली बोट यमुना नदीत उलटली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही 5 जण बेपत्ता आहे. तर 15 भाविकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व भाविक लुधियानामधून मथुरेला आले होते, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान बोट पलटी झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, आरडा -ओरड सुरू झाली. भाविकांचा आवाज ऐकून स्थानिकांनी नदीकडे धाव घेतली, पोलीस दल देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. मात्र तरी देखील या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अजूनही 5 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. 15 जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पंजाब राज्यातील लुधियाना येथील 30 भाविक मथुरा येथे आले होते. नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी 30 भाविक एका नावेमध्ये बसले, मात्र ही नाव यमुना नदीमध्ये उलटल्याची घटना घडली आहे. इतर दिवसाच्या तुलनेमध्ये आज हवेचा वेग जास्त होता. हवेचा वेग अधिक असल्यामुळे नावेचं संतुलन बिघडलं आणि ही नाव तिथे असलेल्या एका पुलाला धडकली, अपघातानंतर नाव नदीत पलटी झाली. नाव नदीत पलटी होताच बचावासाठी या नावेमध्ये जे लोक होते, त्यांनी आरडा-ओरड सुरू केली.

त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील दाखल झाले. यातील 15 जणांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 5 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल माहिती घेतली आहे. या अपघाताबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं असून, या घटनेतील जखमी लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.