IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं
esakal April 13, 2026 04:45 AM

MI vs RCB, Marathi News: मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (१२ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा पहिल्या ४ सामन्यांतील सलग तिसरा पराभव आहे.

मुंबईने या हंगामात पहिला सामना जिंकला होता. पण नंतरचे तिन्ही सामने मुंबईने पराभूत झाले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोरील आता आव्हान आणखी कठीण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल, असं हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सामन्यानंतर सांगितले आहे.

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

तो म्हणाला, 'आम्ही खूप विकेट्स गमावल्या तशाच आम्ही खूप धावाही दिल्या होत्या. मला वाटतं आम्हाला सातत्याने पिछाडीच भरून काढावी लागत होती. खरंतर गेल्या काही सामन्यात, फलंदाजी असो वा गोलंदाजी, आम्हाला सामन्यात वर्चस्व गाजवण्यापेक्षा पिछाडी भरून काढावी लागली. आम्हाला नक्कीच त्याचा विचार करावा लागणार आहे. आम्ही काय चांगले करू शकतो आणि कशी पुन्हा लय मिळवू शकतो, आम्हाला काय करायची गरज आहे, याचा विचार करावा लागणार आहे. आता आमच्याकडे काही दिवस ऑफ आहेत, त्यानंतर आम्हाला खेळायचे आहे. प्रामाणिकपणे सांगायचे, तर आता खूप गोष्टींचा पुन्हा विचार करावा लागणार आहे. नक्कीच आत्ता जे सुरू आहे, ते काम करत नाहीये.'

तो पुढे म्हणाला, 'काही सामन्यात आम्ही नाणेफेकही जिंकलो, पण मला वाटतं की आम्हाला विचार करावा लागेल की फलंदाजीत आणि गोलंदाजीत दुसरे पर्याय काय आहेत. जर खेळपट्टी पाहिली, तर जर आम्ही चांगली फलंदाजी केली असती, तर चांगलं झालं असतं. आम्हाला अजूनही चांगले क्रिकेट खेळावे लागणार आहे. आम्हाला चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करावी लागेल. आम्हाला पॉवरप्लेमध्ये लय कशी मिळेल, याचा विचार करावा लागेल. जर तुम्ही फलंदाजी किंवा गोलंदाजी पाहिली, तर आम्ही पॉवरप्लेमध्ये पिछाडी भरून काढत होतो. आता बाकी पर्यायांचाही विचार होईल. '

या सामन्यात फिल सॉल्ट (७८), रजत पाटिदार (५३), विराट कोहली (५०) आणि टीम डेव्हिड (नाबाद ३४) यांच्या फलंदाजीच्या जोरावर बंगळुरूने २० षटकात ४ बाद २४० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ५ बाद २२२ धावा करू शकला. मुंबईसाठी हार्दिक पांड्याने २२ चेंडूत ४० धावा केल्या. तसेच शेरफेन रुदरफोर्डने ३१ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांसह शेवटी ७१ धावांची आक्रमक खेळी केली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

रुदरफोर्डला संघात घेण्याबाबत हार्दिक म्हणाला, 'जेव्हा आम्ही त्याला घेतलं, तेव्हा खूप उत्साही होतो. आम्हाला त्याची क्षमता आणि ताकद माहिती होती. तो ज्याप्रकारे फलंदाजी करतो, त्याने आम्हाला ज्यादाचा पर्याय मिळतो आणि आत्मविश्वासही मिळतो की जर आम्हाला काही बदल संघाच्या गरजेनुसार करायचे असतील, तर आम्ही ररू शकतो. कारण तो तशी फलंदाजी करत आहे. '

मुंबई इंडियन्सला पुढचा सामना गुरुवारी (१६ एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.